digital products downloads

‘महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास…’, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन, म्हणाले ‘आता थांबायला हरकत नाही, कारण…’

‘महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास…’, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन, म्हणाले ‘आता थांबायला हरकत नाही, कारण…’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरु केलेलं आंदोलन तूर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी, आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं. यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलनं सुरु केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे. आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता. त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की”.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना..
सस्नेह जय महाराष्ट्र.

सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.

मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली. 

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?

आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. 

त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील ! 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp