
Nishikant Dubey Slams Uddhav Thackeray Raj Thackeray: भारतीय जनता पार्टीचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हिंदी-मराठी भाषेच्या वादाची तार छेडली आहे. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दुबेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दुबेंनी एक विशेष मुलाखत दिली. यावेळी बिहारमधील निवडणुकीसंदर्भात भाष्य करतानाच त्यांनी मुंबईतील राजकारणावरही भाष्य करताना ठाकरें बंधुंवर टीका केली आहे.
ठाकरे बंधुंबद्दल काय म्हटलं या खासदाराने?
दुबेंनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बोलातना ठाकरे गट आणि मनसेवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पुढील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपणार आहे,” असं विधान दुबेंनी केलं आहे. दुबेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील मराठी मतांवरुन काय भाष्य केलं?
निशिकांत दुबेंनी याआधी मराठी भाषा आणि महाराष्ट्राविरोधात विधानं केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. यातच आता पुन्हा त्यांनी ठाकरे बंधूंबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील मतदारांबद्दलही दुबेंनी भाष्य केलं आहे. मुंबईमधील मतं विभाजनाची आकडेवारी सांगताना दुबेंनी ठाकरेंचं भाषिक राजकारण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयशी ठरेल आणि त्यांच्या हाती निराशाच लागेल असं भाकित झारखंडच्या या खासदाराने व्यक्त केलं आहे.
मराठी भाषिक लोकांबद्दल दुबे काय म्हणाले?
‘मुंबईत फक्त 30 टक्के लोक मराठी बोलतात. 30 टक्के लोक हिंदी बोलतात. अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात. त्याचप्रमाणे काही लोक गुजराती, तर काही भोजपुरी बोलतात. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषेवरील हे राजकारण यावेळी पूर्णपणे अपयशी ठरणार आहे,’ असा दावा दुबेंनी केला आहे. आता दुबेंच्या या विधानावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे आज काय बोलणार?
दुसरीकडे आज मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. सकाळी साडेदहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होणार आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना काय बोलणा? नेमक्या काय सूचना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.