
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत.
.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारने महिलांना वाटलेल्या प्रत्येकी 10 हजार रुपयांमुळेच एनडीचे बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत विरोधकांची मातीच होईल
मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाही. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे? विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील, असे ते म्हणाले.
मुंबईत महायुतीचाच महापौर होईल
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतो की स्वतंत्र लढत आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण कसे लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तिथे महायुती निवडून येईल यात शंका नाही.
अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे ते म्हणाले.
आत्ता पाहू काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते.
तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



