
राज्यात भाजपविरोधात कणखरपणे काँग्रेस लढत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रतेची जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र ते महायुती म्हणून लढले आहेत. हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार करता आला असता. मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू, असे सूचक विधान कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला आहे. सतेज पाटील म्हणाले, सहकारातील समीकरणे वेगळी आहेत. जिल्हा बँक किंवा गोकुळ अशा संस्था टिकल्या पाहिजेत. म्हणून मागे आम्ही पक्षविरहित आम्ही निवडणूक लढवल्या. मात्र आता माहित नाही. जिल्ह्यात काँग्रेस वाढवणे माझी जबाबदारी आहे, काँग्रेसच्या विचाराचा वर्ग कोल्हापुरात आहे. अजून विधानपरिषदेचे दोन वर्ष माझी बाकी आहेत, मी पुढे कसे निवडणूक लढवणार हे आता सांगू शकत नाही, तोपर्यंत हे सरकार राहील नाही राहील माहित नाही. पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, आमच्या काँग्रेसने 15, स्वाभिमानी 1, शिवसेना ठाकरे गट 1 आणि शिवशाहू आघाडी 1 अशा एकूण 18 जागा आम्ही जिंकल्या आहेत. घवघवीत यश जरी नसले तरी प्रत्येक तालुक्यात आम्ही पोहोचलो आहोत. तीन सत्ताधारी पक्ष आणि बिगर सत्तेतील आमचा पक्ष आहे. मात्र, सत्तेमुळे काहीजण तिकडे गेले आहेत, सत्तेमुळे त्यांना हे यश मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सत्तेचा प्रभाव पहायला मिळत असतो, तेच आता पहायला मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, स्व. अजितदादांच्या निधनानंतर सहानुभूतीचा उपयोग राष्ट्रवादीला निश्चित झाला. कदाचित दादा असते तर अजून यश त्यांना मिळाले असते. दरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या मुलाचा पाडळी खुर्द मतदारसंघातून पराभव झाला. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, विश्वास आबाजी पाटील, राजू सूर्यवंशी काँग्रेस मधून उभारले असते तर कदाचित निवडून आले असते. नरके गटातील लोकांना देखील ऐनवेळी आबाजी आल्यानंतर कदाचित ते पटले नसेल, त्यांना आत्मचिंतन करावे लागेल. शेवटी झेडपी, पंचायत समिती स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत. मतचोरी, मतदार यादीतील घोळ याबाबत काँग्रेसची भूमिका आहे, परंतु आत्ताच्या निकालात अशा गोष्टी कुठे समोर आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या राज्यव्यापी भूमिकेवर सतेज पाटील म्हणाले की, आमची पक्षाची बैठक 18 तारखेला मुंबईत होत आहे, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निकाल आणि राज्यातील काँग्रेसची पुढील भूमिका यावर चर्चा होईल, महाविकास आघाडीबाबत निर्णय त्यानंतर जाहीर करु. वरिष्ठांची भूमिका अशीच आहे की शक्य तिथे आघाडी, शक्य तिथे एकटे लढा, असे त्यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



