
अभिनेते-दिग्दर्शक सुबोध भावे यांनी आजच्या युवा पिढीला आदर्श वाटतील अशी व्यक्तिमत्वे समाजात दिसत नसल्याचे मत व्यक्त केले. एम.ई.एस. भावे प्राथमिक शाळा सभागृह येथे अभय अरुण इनामदार लिखित ‘भूछत्र’ या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
.
प्रत्येक काळ त्याची गणिते घेऊन येतो. महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही काही लोक गोंधळलेले असतील, परंतु महापुरुषांनी त्यांना दिशा दिली. ‘भूछत्र’ हा काळाचा परिणाम असतो, असे भावे म्हणाले.
मिहाना पब्लिकेशन्स प्रकाशित या कादंबरीचे प्रकाशन सुबोध भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, लेखक अभय अरुण इनामदार आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या संचालिका अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या.
भावे पुढे म्हणाले की, समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, पण ते आनंदी नाहीत. समाज ‘हे करू नको – ते करू नको’ असे सांगून आनंद हिरावून घेत आहे. तुमच्या आयुष्यात आनंद कशाने येतो याचा विचार समाज करत नाही. त्यामुळे आनंद शोधणारे लोक समाजाला ‘भूछत्र’ वाटू शकतात.
माणसाच्या जगण्यात आणि यशात आनंद महत्त्वाचा असतो. ‘हाती घ्याल ते तडीस न्या’ हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे आणि आमच्या शाळेतून बाहेर पडलेले कुणीही बेरोजगार नाही, याचा अभिमान आहे. ‘भूछत्र’ ही वाचकाला आपली कथा वाटेल, ही एका ध्यासाचा आणि शोधाचा प्रवास आहे. माणसाचा प्रवास निरंतर सुरू असतो, असेही भावे यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी सांगितले की, कथा, कादंबरीसारख्या साहित्य प्रकारांना अलीकडे लेखक अधिक हात घालत आहेत, ही चांगली बाब आहे. ‘भूछत्र’ कादंबरीतील २२ वर्षांचा तरुण समाजाकडे सकारात्मक दृष्टीने बघतो, बदल घडवू इच्छितो आणि कुठेही निराश होत नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.