
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने येत्या 14 ऑक्टोबर रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
.
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे हे शिष्टमंडळ जाणार आहे. निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे आणि राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या काही समस्या आहेत, त्या मांडण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली आहे.
सर्व पक्षांनी आमच्यासोबत यावे
संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या काही समस्या आहेत. यात भाजपची देखील समस्या आहे. देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासोबत निवडणूक आयोगासमोर जात भूमिका मांडली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यातील तज्ञ आहेत त्यांनी सहभागी व्हावे. हे काही मविआचे शिष्टमंडळ नाही. राज ठाकरे अद्याप मविआचे घटक नाही पण ते देखील आमच्यासोबत येत आहे. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात 3 लाख मते गाळली गेली भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी असे गडकरी यांनी स्वत: सांगितले आहे, ते फार गंभीर आहे. निवडणूक आयोग राजकीय दबावाखाली काम करत आहे, तरीही त्यांना भेटून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणं भिंतीवर डोकं मारण्यासारखे आहे.
मविआच्या शिष्टमंडळात असणार हे नेतृत्व
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही समावेश असून, ही बैठक 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या नेत्यांनाही पत्र पाठवले
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. निवडणूक आयोग हे संवैधानिक पद आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भाजपच्या देखील काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे. याव्यतिरिक्त महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आम्ही पत्र पाठवले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊतांची X वर पोस्ट काय?
संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. 14 ऑक्टोबर 12.30 वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.