
CM Devendra Fadanvis On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तर विधानसभेवेळी आपले उमेदवार उभे केले होते. पालिका निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणी करणार? असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय. झी २४ तासच्या महाराष्ट्र गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. संपादक कमलेश सुतार यांनी मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. 2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्जिकल स्ट्राइक होतं. आमचं सर्जिकल स्ट्राइक आता संपलंय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आम्ही शंकर, एहसान लॉय’
शंकर, एहसान, लॉय यांच्याप्रमाणे आमचंही त्रिकूट आहे. आमच्याकडेही कोणीतरी शास्त्रीय संगीत आळवत, गिटार वाजवत. कोणीतरी वेगळा सूर आळवत पण आमची स्टाइल तशीच आहे. यात ड्रमर कोण आहे, हे कधीच कोणाला कळणार नाही, असे मिश्किलपणे मुख्यमंत्री म्हणाले.
‘भूक लागते तेव्हाच राग येतो..’
मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागलेली असते. तेव्हा मी चिडचिड करतो. कोणत्याही परिस्थितीचा मी सामना करु शकतो. मला राग आलाय समजलं की खायला आणून द्या. ५ मिनिटांत माझा राग निघून जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
१०० दिवसांचा कार्यक्रम
आम्ही १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता. ज्यात स्वच्छता, नामफलक लावायचं होतं प्रलंबित कामे पूर्ण करायची होती. सर्व कार्यालयांनी अतिशय योग्य रितीने हे काम पार पाडलं. एकूण ९०० सुधारणा करायच्या होत्या. त्यातील ७६८ म्हणजे ८० टक्के कामे आम्ही केली. यासाठी एक संस्था नेमून त्याचे मुल्यमापन केले. एखादा अपवाद वगळता सर्वजण त्यात पास झाले. याचा पुरस्कार म्हणून मी आता १५० जणांचा कार्यक्रम मी त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकार म्हणून जे उपकरण आहे ते संस्था म्हणून तयार व्हायला हवी. सरकारच्या कामासाठी नागरिकाला कार्यालयात जायची गरज लागू नये. सर्व कामे मोबाईलवर होतील. यातील ६० टक्के काम आम्ही केलंय. आता ४०टक्के काम राहिलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तिन्ही पक्षाच्या खात्यांनी चांगले काम केलंय. तीन लोकाचं सरकार नॅचरल डिलीव्हर होऊ शकत नाही. जिथे एकमत होत नाही ते आम्ही स्थगित ठेवतो. तोडगा कसा काढायचा हे सांगता आलं असतं तर तोडगा काढूनच आलो असतो. तोडगा निघेल असं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं पण महिना कोणता असेल हे सांगितलं नव्हतं, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
‘राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ’
राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो. राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल नाही मिळेल हे सांगता येत नाही. लोकसभेत ते आमच्यासोबत होते. विधानसभेत ते आमच्यासोबत होते की नव्हते ते माहिती नाही. पालिका निवडणुकीत काय होईल माहिती नाही. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जास्त जागा लढाव्या हे सर्वांना वाटतं. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही, असे ते यावेळी म्हणाले.
ताळमेळ कसा साधता?
एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हे भावनिक असतात. त्यांच्याकडे संवेदनशिलता अधिक असते. अजितदादा राजकारणात अतिशय प्रॅक्टीकल आहेत. भावनेत न अडकता निर्णय घ्यायचा असं त्यांना वाटतं. दोघांसोबतही डील करणं सोपं जातं. म्हणूनच आम्ही शंकर एहसान लॉय आहोत, असे फडणवीस म्हणाले.
पालिका निवडणूक
आम्ही मुंबई महायुती म्हणूनच लढणार. शंभर टक्के महायुती येईल आणि महायुतीचाच महापौर बसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
युतीत यायचे नाही, उद्धव ठाकरेंनी ठरवलंच होतं. त्यामुळे युतीत सडलो वैगेरे ते म्हणत होते. कधीकधी कौतुकावरही सावरुन प्रतिक्रिया द्यावी लागते. उद्धव ठाकरे कधी कौतुक करतात कधी शिव्या देतात. एकत्र येण्याची अशी कोणतीही परिस्थीती आता दिसत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.