
BJP on Saamana Editorial: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 130 व्या घटनादुरुस्ती विधेयकासह केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन दुरुस्ती विधेयक आणि जम्मू काश्मीर फेररचना दुरुस्ती ही दोन विधेयकं बुधवारी लोकसभेत मांडण्यात आली. लाचखोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा एखाद्याला 30 दिवस कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरुन आपोआप पदावरुन हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे. मात्र हा कायदा झाला तर त्यांचा गैरवापर होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान भारतातील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य खतम करून देशाला हुकूमशाहीकडे नेण्यासाठी आणलेल्या कायद्याची होळी करायलाच हवी असं मत ठाकरेंच्या शिवसेनेने सामना संपादकीयमधून मांडलं आहे. यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांना उत्तर दिलं आहे.
“राम मंदिर आम्ही बांधतो’ अशा फुशारक्या मारणारे, ऊठसूठ रामराज्याचा गजर करणारे उबाठा आता पायाखालची वाळू सरकल्यानंतर सामनात अग्रलेख लिहीत कायदा जाळण्याची भाषा करू लागले, हा अराजकतावादी राहुल गांधींच्या सहवासाचा संसर्ग असावा,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
“म्हणूनच, मूल्याधीष्ठित राजकारणाचा आग्रह धरण्यासाठी भाजप सरकारने सादर केलेल्या संविधान दुरुस्ती कायद्याविरोधात त्यांचाही थयथयाट सुरू आहे. मोर नाचतो म्हणून लांडोरीलाही नाचावेसे वाटते. पण पिसाराच नसल्याने तिचा नाच बेढब ठरतो. उबाठाचे तसेच झाले आहे. राहुल गांधींची कठपुतळी झाल्यापासून त्यांच्या बोटाच्या तालावर नाचणाऱ्या या लांडोरीचे खरे राजकारण आता उघडे पडले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राम मंदिर आम्ही बांधतो’ अशा फुशारक्या मारणारे, ऊठसूठ रामराज्याचा गजर करणारे उबाठा आता पायाखालची वाळू सरकल्यानंतर सामनात अग्रलेख लिहीत कायदा जाळण्याची भाषा करू लागले, हा अराजकतावादी राहुल गांधींच्या सहवासाचा संसर्ग असावा.
म्हणूनच, मूल्याधीष्ठित राजकारणाचा आग्रह धरण्यासाठी भाजप…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 21, 2025
“रामराज्य हे भारतीय जनतेचे स्वप्न आहे. जिथे शासनात पारदर्शकता असेल, न्यायाचा सर्वोच्च विजय असेल आणि सत्ताधारी आपली नैतिक जबाबदारी टाळणार नाहीत, तेथे रामराज्य सुरू होते. पण देशातील काही राज्यांत काही मुख्यमंत्र्यांनी मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यावरही साधनशुचिता, नैतिकतेला मुठमाती देत बिनधास्तपणे तुरुंगातून सरकार चालविले, आणि रामराज्याची जनतेची अपेक्षा खुंटीवर टांगली,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “राजकारण मुल्याधिष्ठीत असले पाहिजे या भूमिकेतूनच नैतिकता गुंडाळून तुरूंगातून सरकार चालविणाऱ्याना अटकाव करण्यासाठीच गृहमंत्री अमित शाह यांनी ‘संविधान (130 वी दुरुस्ती ) विधेयक, 2025’ लोकसभेत सादर केले तेव्हापासून काँग्रेस, इंडी आघाडीने, त्यांच्या कथित इकोसिस्टमने तसेच त्यांच्या उबाठासारख्या अंकितांनी आकांडतांडव सुरू केले”.
“या कायद्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे, पाच वर्षांची शिक्षा असणाऱ्या गुन्ह्याअंतर्गत अटक झाली व 30 दिवसात जामीन मिळाला नाही तर पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा मंत्री यांना हटविण्याचा हा कायदा आहे. इंदिरा गांधी यांनी घटनाबदल करीत पंतप्रधान पदाला विशेष संरक्षण दिले होते. आता मोदीजींनी तर पंतप्रधान पद सुध्दा या कायद्याच्या कक्षेत आणले. कोणताच पक्ष सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही, या अटलजीच्या विधानावर आमचा विश्वास आहे. सरकारे आती रहेगी जाती रहेगी. मगर देश चलना चाहीये, हीच आमची धारणा आहे. त्यामुळे थयथयाट करणाऱ्यांनी या दुरुस्तीमध्ये आपल्या भविष्याचे भय न पाहता त्याचे समर्थन केले पाहिजे,” असं मत त्यांनी मांडलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.