
एखाद्या वेबसीरिज किंवा चित्रपटाला शोभेल असे थरारनाट्य गुरूवारी मुंबईच्या पवई भागात घडले. रोहित आर्य नामक व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली 17 लहान मुलांचे अपहरण केले. हे अपहरणनाट्य रोहितला यमसदनी पाठवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आले. त्यानंतर
.
विजय कुंभार शुक्रवारी आपल्या एका पोस्टद्वारे रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात दीपक केसरकर व आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. दीपक केसरकर यांनी रोहित आर्यला त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे . कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
रोहित आर्यच्या विषयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही – रोहित पवार
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाकडं थकीत असलेल्या बिलासाठी रोहित आर्याने मुलांना ओलीस धरण्याचं अघोरी आणि गुन्हेगारी कृत्य केलं यात काही शंका नाही, पण त्याच्या थकीत बिलाच्या विषयाकडं मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. ठेकेदारांची तब्बल ८० हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत.
बिलं मिळत नसल्याने यापूर्वी नागपूर तसंच सांगली येथील तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली आहे. तरीही सरकारला याचं गांभीर्य कळत नाही. थकीत बिलांची मागणी करणाऱ्या ठेकेदारांनी चुकीचं पाऊल उचलावं आणि यात त्याचा एन्काऊंटर करावा किंवा त्याने स्वतःहून तरी आत्महत्या करावी, याची तर सरकार वाट बघत नाही ना? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

आर्यवर ही वेळ का आली? – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अन्य एक नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला काही प्रश्न विचारलेत. कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी आता अपहरण करावे लागत आहे. ही पोस्ट CMO महाराष्ट्र ची आहे. यात काल एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्य याचा उल्लेख आहे. रोहित आर्यचे सरकारकडे काही कोटी रुपये थकीत होते. ते मिळत नसल्याने त्याने लहान मुलांचे अपहरण करण्याचा कट रचला. अर्थात याच समर्थन मी मुळीच करणार नाही, पण आर्यवर ही वेळ का आली..? याच उत्तर सरकार देणार आहे का..? असे ते म्हणालेत.

रोहित आर्यचा शिंदे, सामंत, केसरकरांसोबत फोटो
जितेंद्र आव्हाड यांनी रोहित आर्यचा एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत रोहित आर्य हा दिसून येत आहे. हा फोटो कोणत्या तरी उद्घाटन कार्यक्रमातील असल्याचे वाटत आहे.
सचिन सावंत यांचीही टीका
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या प्रकरणी सरकावर टीका केली आहे. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, रोहित आर्यने जो मार्ग पत्करला तो गुन्हेगारी स्वरूपाचा होता, यात शंका नाही. पण त्या मार्गावर त्याला प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे, त्या स्थितीपर्यंत नेणारे हे महायुतीचे शासनच आहे. राज्यात असे अनेक कंत्राटदार आहेत ज्यांची बिले अद्याप थकलेली आहेत. जवळपास ₹89,000 कोटींची देयके शासनाकडून प्रलंबित आहेत. या शासनाने राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले, पण भाजपा–शिवसेना नेत्यांच्या तुंबड्या मात्र भरल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग असो, शिक्षण विभाग असो किंवा इतर कोणताही विभाग. अनेक कंत्राटदार शासनाच्या दारात खेटे घालत आहेत. अनेकांनी कर्जे घेतली, अनेक उध्वस्त झाले. सांगलीत हर्षल पाटील यांचे दीड कोटी रुपये जल जीवन मिशनखाली थकले होते; अखेर त्यांनी आत्महत्या केली. पण शासनाने त्यांच्याविषयी हात झटकले. नागपूरचे कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनीही नुकतीच आत्महत्या केली. आणि आता रोहित आर्या ज्याचे 45 लाख रुपये थकले होते.
ते पुढे म्हणाले, रोहित आर्यने अनेक वेळा उपोषणे केले असे समजते. शेवटी पुणे पत्रकार संघासमोर आंदोलन केले. ही प्रेस नोट त्याचीच आहे का? याचा तपास करणे आवश्यक आहे. यामध्ये त्याने स्पष्टपणे नावे घेतली आहेत. यानंतरच त्याने तो गुन्हेगारी मार्ग स्वीकारला. तो मार्ग चुकीचा आहे, यात वाद नाही. पोलिसांनी त्या ओलीस मुलांची सुटका केली त्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन, पण त्याला त्या टोकाला नेणारेही तितकेच दोषी आहेत!
एक कथा आहे, एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली गेली होती. शेवटची इच्छा म्हणून त्याने आपल्या आईला भेटण्याची विनंती केली. आई जवळ आली तेव्हा त्याने म्हणाले, “कानात काही सांगायचे आहे,” आणि मग त्या आईचा कान करकचून चावला. तो म्हणाला, “तू मला योग्य वेळी थांबवले असतेस, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती.” मरणाच्या आधी शासनाचे कान त्या आर्यच्या जवळ असले पाहिजे होते, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
रोहित आर्यचे एन्काऊंटर फेक:वकील नितीन सातपुते यांचा गंभीर आरोप; API ला हिरो व्हायचे म्हणून छातीत गोळी घातल्याचा दावा
मुंबई –आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याचे मुंबई पोलिसांनी केलेले एन्काऊंटर फेक असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी केला आहे. पोलिसांना रोहित आर्य यांच्या हात किंवा पायावर गोळी मारता आली असती. पण डीसीपी अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे असल्यामुळे त्यांनी थेट त्याच्या छातीत गोळी घालून त्याला यमसदनी पाठवले, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



