
Sunil Tatkare on Rohit Pawar Allegations: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर तसंच विलिनीकरणावर भाष्य केलं. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांच्या दुर्देवी निधनाची सखोल चौकशी करावी ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका असल्याचंही ते म्हणाले आहेत.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी’
“सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यानंतर आज त्या दिल्लीत आल्या आणि नरेंद्र मोदी, अमित शाहांची भेट घेतली. दादांच्या अकाली दु:खद निधनाबद्दल संवेदना व्यक्त कऱण्यात आल्या. पंतप्रधान आणि अमित शाहांनी आम्हाला आश्वस्त केलं. ज्या स्थितीतून वहिनींनी धीरोदात्तपणे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली. पक्ष, पक्षाचं संघटन आणि महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनी जबाबदारी स्विकारण्याचं धैर्य दाखवलं त्याबद्दल सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. केंद्र सरकारची पूर्ण ताकद महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे राहील अशाच संवदेना व्यक्त झाल्या,” अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.
विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं. “आज राजकीय चर्चेचा प्रश्न नव्हता. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर वहिनींनी जबाबदारी स्विकारली त्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या,” असं सांगताना त्यांनी आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न येत नाही असं म्हटलं.
‘एनडीएच्या वतीने येण्याची स्पष्टता कऱण्याची गरज’
“विलिनीकरण कोणत्या पक्षात होणार आहे? आम्ही एनडीएत आहोत. दादा असतानाच मी वारंवारा भूमिका स्पष्ट केली होती की, आम्ही दादांच्या नेतृत्वात एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो आमचा निर्णय कालही होता आणि आजही आहे. एनडीएच्या वतीने येण्याची स्पष्टता कऱण्याची गरज आहे. वहिनींनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली असताना, आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय, विधीमंडळ सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला. वहिनीच विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असल्या पाहिजेत असं ठरवलं,” असं ते म्हणाले.
‘2014 पासून भाजपाच्या सोबत सरकारमध्ये असावं अशी दादांची भूमिका’
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एनडीएसोबतची येण्याची तयारी असेल तर विलिनीकरण होणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “जर तर वर बोलू शकत नाही. 2019 किंवा 2014 पासून भाजपाच्या सोबत सरकारमध्ये असावं अशी दादांची भूमिका होती. राष्ट्रवादीच्या त्यावेळीच्या सर्व बैठकीत ती भूमिका मांडतही होते. 2019 साली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही झाला होता. तेव्हाही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तीनपेक्षा दोन पक्षांचं सरकार महाराष्ट्र प्रगतीपथवावर नेईल अशी त्यांची भूमिका होती. 2023 मध्ये ज्यावेळी वारंवार पक्षात चर्चा होऊनही भाजपासोबत जाण्याचा निर्णय झाला नाही तेव्हा आम्ही निर्णय घेतला. आमच्या विचारांसह एनडीएत सहभाग झाला तो पुढेही राहणार आहे”.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्यास उत्सुक नव्हत्या?
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्यास उत्सुक नव्हत्या असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यावर ते म्हणाले की, “जो निर्णय झाला तो सहमतीने झाला, एकमताने झाला. भाष्य करण्याचा इतरांना अधिकार नाही, कारण हा राजकीय निर्णय आहे. आमचा पक्ष निवडणूक आयोग, आणि सुप्रीम कोर्टाने अजितदादांकडे दिला होता. आमच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हालाच आहे”. सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही, विषयही झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा का दिलेला नाही? यावर त्यांनी अजित पवारांचा दाखला दिला. ‘कोणत्याही व्यक्तीला राज्याचा किंवा देशाचा मंत्री होत असताना सहा महिने सभागृहाचा सदस्य होण्याचा अवधी असतो. इतर सभागृहाचं सदस्यपदही कायद्याने ठेवता येतं. अजितदादा 1991 ला लोकसभेचे सदस्य झाले तेव्हा शरद पवार संरक्षणमंत्री झाले. अजित पवार राज्यमंत्री झाले तेव्हाही ते लोकसभेचे सदस्य होते. अशी अनेक उदारहणं आहेत”.
‘अजित पवारांच्या दुर्देवी निधनाची सखोल चौकशी करावी’
अजित पवारांचा मृतदेह पुरल्याच्या दाव्यांवर ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की, अजित पवारांच्या दुर्देवी निधनाची सखोल चौकशी करावी. कोणत्याही तपास यंत्रणांमार्फत केद्र आणि राज्य सरकारने करावी. सत्य देशातील जनतेच्या पुढे आणावं. आमची पहिल्या दिवसापासून हीच भूमिका आहे”.
“माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. 5.10 ला अजित पवारांकडे होतो. पावणे सातला भेट संपली. ती भेट तीन दिवस आधी ठरली होती. कारण दोन दिवस आधी दादा पुण्याच्या आणि मी रायगडच्या दौऱ्यावर होतो,” असंही त्यांनी सांगितलं.
‘विलिनीकरणाची चर्चा करण्याची घाई का झाली’
विलिनीकरणासंदर्भातील जर त्यांच्याकडे माहिती, पुरावे असतील तर जरुर द्यावेत. विलिनीकरणाची चर्चा करण्याची घाई का झाली त्यावर कोणी बोललेलं नाही असंही ते म्हणाले.
‘राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर होईल’
विलिनीकरणासंदर्भात सुप्रिया सुळे, अजित पवार आणि तुमची बैठक झाली होती का? यावर ते म्हणाले, त्याचे व्हिडीओ, ऑडिओ समोर येऊ देत मग मी बोलणार. मी पण 40 वर्षं राजकारणात आहे. मी मोठ्या नेत्यांच्या तालमीत घडलो आहे. मला माझं राजकीय भान आहे. माझी भेट झाली त्याचे व्हिडीओ वैगेरे दाखवू दे मग मी बोलतो. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर होईल असं त्यांनी सांगितलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



