
Pune Nagpur Vande Bharat Train: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे आणि उपराजधानी असलेलं नागपूर शहर लवकरच वंदे भारत ट्रेनने जोडलं जाण्याची शक्यता आहे. या मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा देण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचं वृत्त आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या एका विधानामुळे पुणे-नागपूर वंदे भारत प्रवास लवकरच करण्याची संधी मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर-पुणे या राज्यातील सर्वात व्यस्त मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नुकत्याच दोन मार्गांवर रेल्वे मार्गांना हिरवा झेंडा दाखवताना म्हटलं आहे.
सध्याची अवस्था काय?
सध्या पुणे आणि नागपूर या महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या शहरांदरम्यान रेल्वेने प्रवास करताना सध्या 14 ते 16 तासांचा कालावधी लागतो. अनेकदा या मार्गावरील रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा या मार्गावर कन्फॉर्म तिकीटं मिळत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार असते. या मार्गावर अधिक वेगवान आणि अधिक परिणामकारक पद्धतीने धावणाऱ्या ट्रेन सोडण्याची आवश्यकता आहे. हीच गरज लक्षात घेऊन या मार्गावर वंदे भारत सुरु करण्याची मागणीही बऱ्याच काळापासून होत आहे.
अर्ध्याहून कमी वेळ लागणार
खरोखरच पुणे आणि नागपूरदरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु झाली तर या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ 14 ते 16 तासांवरुन थेट 3 ते 5 तासांपर्यंत येईल. म्हणजेच सध्या लागणाऱ्या वेळेच्या अर्ध्याहून कमी वेळात वंदे भारत ट्रेन पुणे-नागपूर अंतर कापेल. वंदे भारत ही सेमी हायस्पीड ट्रेन असून ही पूर्णपणे एसी ट्रेन सध्या धावणाऱ्या ट्रेन्सला उत्तम पर्याय ठरु शकते. या ट्रेनमधील आसन व्यवस्था, वक्तशीरपणा, सोयी-सुविधांचा विचार करता या मार्गावरील सेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल असं सांगितलं जात आहे. या मार्गावर वंदे भारत सुरु झाल्यास खरोखरच ती या दोन्ही शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल यात शंका नाही.
वंदे भारतचं स्लीपर व्हर्जन चालवलं जाण्याची चर्चा पण…
पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक संकेत मिळत असले तरी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत असं सांगितलं आहे. वंदे भारतचं स्लीपर व्हर्जन या मार्गावर चालवलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र याबाबतीत पुढे काहीही घडलं नाही. स्थानिक नेत्यांकडून या मार्गावर वंदे भारत सेवा सुरु करण्याची मागणी केली जात असून त्यासाठी दबाव टाकला जात आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडेच आहे.
ठरणार चौथी वंदे-भारत
पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत सुरु झाली तर भारताच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूरमधील ही चौथी वंदे भारत ट्रेन ठरेल. सध्या नागपूर-बिलासपूर, नागपूर-उज्जेन-इंदूर, नागपूर-सिकंदराबाद या तीन मार्गांवर उपराजधानीतून वंदे भारत धावते. या वंदे भारतमुळे भारताच्या मध्यवर्ती भागातील हाय स्पीड ट्रेन मार्गावरील नागपूर हे प्रमुख केंद्र होईल.
लवकरच ही ट्रेन धावण्याची शक्यता
पुणे- नागपूर वंदे भारत ट्रेन नेमकी कधी सुरु होणार याबद्दलची कोणतीही ठोस तारीख आणि माहिती समोर आलेली नसली तर दोन्ही शहरांमधून टाकला जाणारा दबाव पाहता लवकरच ही वंदे भारत धावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.