
राज्य मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणाशी माझा संबंध नसून माझी बदनामी करून कुणाला तरी मंत्रिपद हवे आहे,’ असा आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला. २००४ पासूनच्या राजकीय कारकिर्दीत चारित्र्यावर कुणीही बोट ठेवू शकले नाही, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. मंत्रालयात झिरवाळ यांच्या दालनात लिपिक राजेंद्र ढेरंग याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना झिरवाळ म्हणाले की, “कार्यालयातील कर्मचाऱ्याने केलेली चूक म्हणजे मंत्र्यांचा त्यात सहभाग आहे, असा होत नाही. हा कोणताही राजकीय ‘ट्रॅप’ असल्याचे मला वाटत नाही, पण या प्रकरणाचा वापर करून माझी प्रतिमा मलिन केली जात आहे.’ या गंभीर मुद्द्यावर आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची ‘कुंडली’ तपासावी- सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “अशा घटनांमुळे सरकार आणि पक्षाची प्रतिमा मलिन होते. मंत्र्यांनी आपल्या दालनात कर्मचारी नियुक्त करताना त्यांची ‘पूर्वचारित्र्य पडताळणी’ करणे अनिवार्य आहे. भ्रष्टाचाराचे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,’ अशा स्पष्ट सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



