
Devendra Fadnavis on Laadki Bahin: लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भावांनी आणि अपात्र बहिणींनीही घेतल्याचं उघड झालं आहे. यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. मात्र या सर्व गोंधळामुळे ही योजना बंद पडणार का? अशी चर्चा रंगली आहे. लाडक्या बहिणीच्या आर्थिक ओझ्यामुळे इतर योजना गुंडाळाव्या लागल्याने अनेक नेतेही उघडपणे टीका करत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुढील पाच वर्षं सुरु राहील असं जाहीर केलं आहे. राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान ते बोलत होते.
“अनेकजण निवडणूक संपल्यावर योजना बंद होतील असं म्हणत होतं. पण पाच वर्षं आपली एकही योजना बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं तर पुढची पाच वर्षही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
‘राज्यात परिवर्तन होणार’
“जोपर्यंत बहिणींचे आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत काहीच होणार नाही. 2029 मध्ये तर तुम्हीच सत्तेत येणार आहात. आमचं काही चालणार नाही. म्हणजे थोडं चालेल पण तुमच्या मदतीने, आशीर्वादाने आणि हुकूमाने चालेल. तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून हुकूम चालवत होत्या. 2029 नंतर मोदींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी दिली आहे. यामुळे राज्यात परिवर्तन होणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘वोटचोरी म्हणणाऱ्यांचं डोकं चोरी झालं आहे’
“अभुतपूवर्व यश मिळाल्याने तुम्ही आनंदी आहात. पण अजूनही काही लोकांचं समाधान झालेलं नाही. तोंडावर पडले, मातीत मिळाले तरी सुधारण्यास तयार नाहीत. रोज म्हणतात वोटचोरी, यांचं डोकं चोरी झालं आहे. त्यांच्यासाठी 25 टक्के आशीर्वाद मागा की सुबुद्धी, अक्कल येवो. कारण लाडक्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही,” असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला.
‘मोदीच येणाऱ्या पिढीचं कल्याण करणार’
“कालपर्यंत परदेशात जाऊन देशाची बदनामी करत होतो. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. यांची महाराष्ट्रात झाली तीच अवस्था बिहारमध्ये होणार आहे. मोदींसारखा नेता जो देशाचा. आत्मनिर्भर भारताचा विचार करतो त्याच्या मागे सर्व मातृशक्ती उभी आहे. मोदी आल्यापासून भाजपा जितक्या निवडणूक जिंकल्या तेव्हा विश्लेषक पुरुषांपेक्षा महिलांनी 5 टक्के जास्त मत दिल्याचं सांगतात. मोदीच येणाऱ्या पिढीचं कल्याण करणार असा विश्वास सर्वांना आहे. आम्ही नेहमी तुमची मान अभिमानाने उंच राहील असंच काम करु,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आम्ही आमच्या नाही तर समाजाच्या, महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी काम करतो. तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि महाराष्ट्राला परिवर्तित करुन दाखवतो,” असंही त्यांनी सांगितलं.
FAQ
1) लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, ज्याअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 (आता ₹2,100 पर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित) आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे.
2) योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?
महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी महिला.
वय 21 ते 65 वर्षे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे.
विवाहित, अविवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला पात्र.
सरकारी कर्मचारी, आयकरदाते, चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असणारे किंवा इतर सरकारी योजनांचा ₹1,500 पेक्षा जास्त लाभ घेणारे अपात्र.
3) योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेले).
बँक खाते तपशील.
अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षे वैध रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
उत्पन्नाचा दाखला (पांढरे रेशन कार्ड असल्यास).
नवविवाहित महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे रेशन कार्ड.
अर्जदाराचा फोटो.
4) अर्ज कसा करावा?
ऑनलाइन: अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉग इन करा, अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
ऑफलाइन: अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज भरा.
‘नारी शक्ती दूत’ ॲपद्वारेही अर्ज करता येतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.