
अमरावतीतील जुना रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून तीन नवे पर्याय समोर आले आहेत.
.
पहिला पर्याय म्हणजे रेल्वे स्टेशन ते बेलपुरा मार्गाचे सुधारीकरण करणे. दुसरा पर्याय जयस्तंभ चौक ते राजकमल चौक दरम्यान नेहरू मैदानातून पायी व दुचाकींसाठी नवा मार्ग तयार करणे. तिसरा पर्याय हमालपुरा आणि बस स्टँड रोडला जोडणाऱ्या उस्मानिया मस्जिद कम्पाऊंडजवळील रस्ता रुंदीकरण करणे.
आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उड्डाणपुलाची पाहणी केली. तासभराच्या पाहणीत उड्डाणपुलाची दोन्ही टोके, जयस्तंभ चौकातील सामरा कॉम्प्लेक्सजवळील नेहरू मैदान मार्ग आणि रेल्वे उड्डाणपुलाखालील मार्गाचे निरीक्षण करण्यात आले.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तीनही पर्यायांवर एकमत झाले. कॅम्प आणि काँग्रेसनगर भागातील अमरावती व अंबागेट तसेच जवाहरगेटच्या आतील अमरावती जोडणारा मार्ग बंद झाल्याने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक मार्गे प्रवास करावा लागत आहे. कॅम्प भागात अनेक शासकीय कार्यालये असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे.
बैठकीला तहसीलदार विजय लोखंडे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर, शहर अभियंता रवींद्र पवार आणि विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.