
Amol Mitkari on Plane Black Box: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसला. हा अपघात होता की घातपात? याची चौकशी अद्याप सुरु आहे. रोहीत पवार यांनी याप्रकरणावर शंका उपस्थित केल्या आहेत. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हेदेखील सातत्याने या अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. आता त्यांनी आणखी एक शंका उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. मिटकरींनी विमानाच्या ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. काय म्हणाले मिटकरी? सविस्तर जाणून घेऊया.
विमान आणि पायलटबाबत शंका
याआधी मिटकरी यांनी विमान कंपनीवर (VSR) गंभीर आरोप केले होते. हे विमान एक वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंदीमध्ये होतं, तरी अजित पवारांना दिलं गेलं. पायलट दोनदा बदलले गेले. शेवटच्या पायलटला मारुन 50 कोटी इतक्या मोठ्या विमा रकमेच्या आमिषासाठी प्रवृत्त केलं गेलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आपत्कालीन स्थितीत ‘मे-डे’ कॉल का आला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अपघातानंतर कागदपत्रे जळाली नाहीत, पण मृतदेह जळाले. अजितदादांचं घड्याळ गायब झालं. विमानात 6 जण होते असं सांगितलं गेलं, पण फक्त 5 मृतदेह सापडले. मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज तातडीने जाहीर करावे, अशी मागणी मिटकरी केली होती. ब्लॅक बॉक्स अहवाल येण्याआधीच हे पुरावे हवे, असं त्यांनी सांगितले. दरम्यान ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती समोर आल्यानंतर मिटकरींचा संशय आणखी बळावलाय.
काय म्हणाले मिटकरी?
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो, असेही ते पुढे म्हणाले. त्यामुळे अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय.
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या… pic.twitter.com/RelNneoBxd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 17, 2026
त्यावेळेला दादांसोबत कोण होतं?
“दादांचा देवगिरीवरुन निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरुन विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही कुठे आहे? कोण त्यावेळेला दादांसोबत होतं?” असा सवालही मिटकरींनी व्यक्त केला. ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या आधीच्या दिवशीच अजित पवारांनी पुण्याला जाण्याचा निर्णय का घेतला नाही? त्यांच्या मनात असलेला पुण्याला मुक्काम करण्याचा कार्यक्रम कोणी बदलला असा सवालही मिटकरींनी केला आहे.
‘दादांच्या मनात होतं पुण्याला…’
“27 जानेवारीला दुपारी साव्वाचारपर्यंत ते मंत्रालयात होते. साडेचारला ते देवगिरीला आले. साडेचार ते साडेसात त्यांन भेटायला पक्षाचे नेते आले होते. आठ वाजता दादा टोटल फ्री झाले होते. कोणाच्या फाइलवर सही राहिली वगैरे, रात्री 10 वाजता वगैरे सहीसाठी थांबले, यात तथ्य नाही. मी जी माहिती घेतली त्यामध्ये दादा आठ वाजता फ्री झाले होते. दादांच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करावा. तुम्ही मुंबईला राहता. मुंबईहून पुण्याला जायला दोन तास लागतात. दहा वाजता दादा पुण्याला पोहोचले असते,” असंही मिटकरी म्हणाले.
‘अचानक विमानप्रवास कोणी ठरवला?’
“सकाळी पाचला उठणे. सहाला कामाला लागणे. सातला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला असते. हा प्रोग्राम कोणी बदलला? अचानक विमानप्रवास कोणी ठरवला? नादुरुस्त विमान, ज्या विमानावर मागील एक वर्ष बंदी आहे तेच विमान दादांना दिलं गेलं,” असं म्हणत मिटकरींनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



