
Election commission: निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्षनेते असा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला नोटिफिकेशन मागं घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. निवडणूक आयोगानं विरोधकांची मागणी पूर्ण केली नाही तर येत्या काळात व्यापक जनआंदोलन महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं जी मतदार यादी निश्चित केली आहे त्या यादीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलेत. राज्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर विरोधकांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली.मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी काही पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले.
त्यातच निवडणूक आयोगानं मतदार याद्यांवर आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांना अवघ्या आठ दिवसांची मुदत दिलीय. निवडणूक आयोगाच्या या कृतीवर राज ठाकरे नाराज झालेत. जर निवडणूक आयोगानं ते नोटीफिकेशन मागं घेतलं नाहीतर दोन दिवसांत विरोधक यावर काय करणार त्याची रणनिती जाहीर करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ घातल्याचा आरोप त्यांनी केलाय. निवडणूक आयोगानं अनेक मतदारांची नावं डिलीट केली. काही बोगस मतदारांची नावं यादीत समाविष्ट केली.
हा सगळा प्रकार मतवध असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. निवडणूक आयोगानं दोन दिवसांचा वेळ मागितलाय. ते काय निर्णय घेतात यावर पुढची रणनिती ठरवणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेत.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. विरोधकांनी मतदार याद्यांवर आक्षेप घेतलेत. निवडणूक आयोगाच्या कार्य़पद्धतीवर विरोधकांनी बोट ठेवलंय. विरोधकांच्या तक्रारींचं निरसन झालं नाही तर येत्या काळात विरोधक मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिलेत.
FAQ
१. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार केलेल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयोगाने अनेक मतदारांची नावे डिलीट केली, तर बोगस मतदारांची नावे समाविष्ट केली, ज्यामुळे मतवध होत आहे. राज ठाकरे यांनीही आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत, आठ दिवसांच्या मुदतीसाठी आक्षेप नोंदवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी पुरावे सादर करत नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे.
२. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला अल्टिमेटम का दिला आहे?
विरोधी पक्षांनी (महाविकास आघाडी आणि एमएनएससह) निवडणूक आयोगाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, जेणेकरून मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त होऊ शकतील. आयोगाने आक्षेपांसाठी अवघ्या आठ दिवसांची मुदत दिल्याने आणि जुलै १, २०२५ ही कटऑफ डेट ठरवल्याने नवीन मतदारांना (१८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना) मतदानाचा अधिकार मिळणार नाही, असा दावा विरोधकांनी केला. जर नोटिफिकेशन रद्द झाले नाही, तर व्यापक जनआंदोलन उभारण्याची धमकी देण्यात आली आहे.
३. या विवादाचा पुढील काय परिणाम होऊ शकतो?
राज्य निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर विरोधकांनी आयोगाला दोन दिवस वेळ दिली आहे. त्यानंतर ते पुढील रणनीती जाहीर करतील. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आंदोलनाची रूपरेषा ठरेल. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका (नगरपालिका, जिल्हा परिषद) तहकूब होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर आणि मतदार यादीची पारदर्शकता मागितली असून, हे प्रकरण निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.