
नाशिक जिल्ह्यातील एका शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. रोहित बागुल असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका होत असून, पालकांच्या रोषानंतर आश्रमशाळेचे
.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, रोहित बागुल हा विद्यार्थी चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली होती, पण त्याला वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे नेमकी जबाबदारी असतांना योग्य वेळी रोहितला वैद्यकीय मदत मिळाली नाही. रोहित आजारी असताना आश्रमशाळेचे अधीक्षक संजय नांदणे हे रजेवर होते, तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ हे देखील शाळेत उपस्थित नव्हते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रोहितचा जीव गेल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबियांनी केला. संतापजनक बाब म्हणजे रोहितच्या मृत्यूनंतर मृतदेह तब्बल पाच तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर पडून होता.
पालकांचा संताप आणि कारवाईची मागणी
रोहितच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त पालकांनी मोठ्या संख्येने शाळेसमोर गर्दी केली. त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.
अधीक्षक, मुख्याध्यापकांचे निलंबन
या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नांदणे यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले.
आश्रमशाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आदिवासी आयुक्त कार्यालयाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.