
BJP Takes Dig At Uddhav Thackeray Mention Sharad Pawar: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. राज्यसभेमध्ये 4 एप्रिल रोजी महाराष्ट्राती सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आता राज्यातून कोणाकोणाला राज्यसभेवर संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागा रिक्त होत असून देशभरात 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यवर शरद पवार जाणार का याबद्दल चर्चा सुरु असतानाच राज्यातील सध्याची आमदार संख्या पाहता काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला एकच उमेदवार पाठवता येणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष पवारांच्या पाठीशी उभे राहणार का असा सवाल उपस्थित होतं आहे. तसेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या जागा रिक्त होत आहेत त्यात उद्धव ठाकरेही असून, ते पुन्हा सभागृहात जाणार का? हा प्रश्नही चर्चेत आहे. असं असतानाच आता भाजपाने शरद पवार खरोखरच राज्यसभेत खासदार झाल्यास उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणं कठीण असल्याचं समिकरण मांडलं आहे. शरद पवार राज्यसभेवर गेले तर उद्धव ठाकरेंची मोठी गोची होईल आणि त्याला काँग्रेस कारणीभूत असेल असं भाजपाने म्हटलं आहे. नेमकं हे समिकरण काय मांडण्यात आलंय ते पाहूयात…
आंखें चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत टीका
महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. “कुर्बानी देगा कौन?” या मथळ्याखाली त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. “गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आंखें चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे. दोघे जिवलग मित्र… दोघेही बिंदूवर प्रेम करणारे… आणि पार्टीत बिंदू दोघांकडे सारखंच लक्ष देणारी.
तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात,
“एकाला कुर्बानी द्यावी लागेल…”
आणि कादर खानचा थेट सवाल —
“कुर्बानी देगा कौन?”
आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
कुर्बानी कोण देणार? शरद पवार? उद्धव ठाकरे?
“महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते. राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत, यासाठी संजय राऊत आग्रही. पण काँग्रेसची अट स्पष्ट — राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला, तर विधानपरिषदेला उद्धव ठाकरेना नाही. म्हणजे समीकरण स्पष्ट — एकाची अडचण ठरलेली,” असं केशव उपाध्येंच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. “आता खरी उत्सुकता याचीच आहे. या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार? उद्धव ठाकरे? की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार?” असा सवाल उपाध्येंनी उपस्थित केला आहे.

असा असेल राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी उमेदवारांना 26 फेब्रुवारी पासून अर्ज भरता येणार आहेत. तसेच 5 मार्च ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. त्यानंतर 6 मार्च रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या वेळेत पार पडणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
भाजपकडून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
दरम्यान, महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांसाठीचे समीकरण विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार ठरते. सध्याच्या समीकरणानुसार भाजपचा वरचष्मा असून महायुतीला 6 जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याची संधी आहे, तर मविआला एक किंवा दोन जागा मिळवणे आव्हानात्मक आहे. मात्र महायुतीला मिळालेल्या 6 जागांचे वाटप भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये कसे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपकडून अधिकचा उमेदवार न दिल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



