
ग्रामीण शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. उपोषण आंदोलनाच्या आज, बुधवारी तिसऱ्या दिवशी या शिक्षकांनी संचमान्यता शासन आदेशाची प्रतिकात्मक ‘अंत्ययात्रा’ काढली. त्यामुळे पोलिसांनी ११ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन
.
प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन झाले. ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलेल्यांमध्ये ठाकरे यांच्यासह कुलदीप डंबारे, अमोल आगे, शरद काळे, अमोल वरेकर, किशोर मालवीय, दिलीप इंगळे, नागसेन रामटेके, उमेश इंगोले, सुरेश चिमणकर, अनिल कोल्हे, ज्योतीराम थोरात यांचा समावेश आहे. संचमान्यतेचा जीआर रद्द करण्याशिवाय विविध ३५ मागण्यांसाठी सोमवारपासून प्रहार शिक्षक संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संघटनेने रक्तदान शिबीर घेऊन शासनाचा निषेध नोंदवला, तर आजच्या तिसऱ्या दिवशी जीआरची अंत्ययात्रा काढली.
दरम्यान माजी राज्यमंत्री व प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचेशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून संघटनेच्या मागण्या व प्रलंबित समस्यांबाबत विभागीय बैठक आयोजित करण्याचे सांगितले आहे. उद्या, गुरुवार, १९ जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होईल. त्यासाठी अमरावती विभागातील शिक्षण खात्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर तडकाफडकी निर्णय घेतले जातील. या बैठकीची तयारी सुरु झाल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.