
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या यात्रेची सोमवारी सांगता झाली. ‘म्हाद्या धाव… म्हाद्या पाव… हर हर महादेव!’ अशा गगनभेदी जयघोषात आणि हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिवभक्तांनी आणलेल्या कावडीतील पवित्र जलाने मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील महादेवाच्या डोंगराचा हा शेवटचा टप्पा अत्यंत उंच आणि दुर्गम आहे. या डोंगरातील ‘मुंगी घाट’ चढणे हे मोठे आव्हान असते. पुरंदर तालुक्यातील सासवड, बेलसर, शिवरी, मावळ आणि एकच पूर भागातून मोठ्या संख्येने भाविक नीरा आणि कऱ्हा नदीसह पंचनद्यांचे पाणी घेऊन कावडींसह दाखल झाले होते. संत तेली भुतोजी बुवा (उर्फ तेल्या भुत्या), निवृत्ती महाराज हळदकर आणि काशिनाथ कावडे यांच्या ‘मानाची कावड’ मुंगी घाटातून वर आणताना भाविकांची मोठी ओढाताण झाली, मात्र ईश्वरी भक्तीच्या जोरावर हा जोखमीचा प्रवास यशस्वी झाला. डोंगराच्या उतारावर बसलेले हजारो भाविक हा थरार आपल्या डोळ्यांत साठवून घेत होते. गुढीपाडव्यापासून सुरू झाला होता सोहळा शिखर शिंगणापूरची ही यात्रा गुढीपाडव्याला गुढी उभारून उत्साहात सुरू झाली होती. या कालावधीत हळदीचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. एकादशीच्या दिवशी इंदूरचे काळगावडे राजे यांनी मंदिरात शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंगी घाटातून कावडी चढवण्याच्या मुख्य विधीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत या कावडी घाटाच्या वर पोहोचत होत्या. पंचनद्यांच्या जलाने अभिषेक कष्टप्रद मार्ग पार करून मंदिर परिसरात पोहोचलेल्या या कावडींमधील पाण्याने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. नीरा आणि कऱ्हा नदीच्या पवित्र जलाने महादेवाला न्हाऊ घालण्यात आले. यात्रेच्या सांगतेवेळी संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगररांगा भाविकांच्या गर्दीने आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दणाणून गेल्या होत्या. या सोहळ्याने भाविकांच्या श्रद्धेचा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



