
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून नंतर त्यांचीच चड्डी घालणे हे नीतेश राणे यांना चांगले जमते, अशा शब्दांत मनसेने मंत्री नीतेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका फेटाळून लावली आहे.
.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने एकीकडे या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे, पम विरोधकांनी मतदारयाद्या स्वच्छ होईपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारयाद्यांत तब्बल 96 लाख खोटे मतदार घुसवण्यात आल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा समाचार घेत त्यांना मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मतदारयाद्या तपासण्याचे आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने त्यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
राज ठाकरे दुसऱ्यांच्या नव्हे स्वतःच्या विचारांनी चालतात
मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे याविषयी बोलताना म्हणाले की, हा नीतेश राणे यांच्या मेंदूचा किंवा भाजपचा प्रॉब्लेम आहे. हिंदू मतदार, मुस्लिम मतदार असा भेद नीतेश राणे यांच्याच डोक्यात येऊ शकतो. आम्हाला फक्त बोगस मतदार कळतात. नीतेश राणे उचलली जीभ व लावली टाळ्याला असे करतात. मी त्यांना आचार्य अत्रेंचे पुस्तक पाठवीन, मग त्यांना रेफरन्स लागेल. राज ठाकरे हे दुसऱ्यांच्या नव्हे तर स्वतःच्या विचारांनी चालतात. आम्ही त्यांच्यासारख्या कधी काँग्रेस, कधी भाजप अशा वेगवेगळ्या कुबड्या बदलत नाही. आम्ही कणकवलीतील मतदार याद्याही तपासणार आहोत. आधी संघावर टीका करायची व नंतर त्यांचीच चड्डी घालायची हे नीतेश राणे यांनाच चांगलेच जमते.
अंबानी, अदानींवरील टीकेचा भाजपला राग का येतो?
संदीप देशपांडे यांनी यावेळी आम्ही अंबानी व अदानींवर टीका केली त्याचा राग भाजपला का येतो? असा सवालही उपस्थित केला. वाढवणमध्ये मराठी लोकांनाच नोकरी देणार आहेत काय? आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न केला की भाजपला राग येतो. अदानी व अंबानी यांना प्रश्न केला की, भाजपला राग येतो. भाजपचा या दोघांशी काय संबंध आहे? हे पहिल्यांदा स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.
आत्ता पाहू काय म्हणाले होते नीतेश राणे?
नीतेश राणे राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले होते की, राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येते, त्यावर लोक विचार करतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण त्यांच्या कालच्या सभेनंतर अशा पद्धतीचे मतचोरीचे आरोप लोकसभा निवडणुकीनंतर का झाले नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकसभेला एकेका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा मतचोरीचे व व्होट जिहादचे आरोप कुणीही केले नाहीत. हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवण्यात आले. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले. त्यावरही कुणी आक्षेप घेतला नाही.
पण लोकसभेला हिरवा गुलाल उधळला गेला त्याचे उत्तर महाराष्ट्रातील हिंदू जनतेने विधानसभेला भगवा गुलाल उधळून दिले. त्यानंतर मतचोरीचे आरोप सुरू झाले. राज ठाकरे सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, हा त्यांच्या संगतीचा परिणाम आहे. कारण, उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली आहे, असे नीतेश राणे म्हणाले.
हे ही वाचा…
हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का?:नीतेश राणे यांचा सवाल; राज ठाकरे यांच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा आरोप
मुंबई – शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.