
समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात घडला. ओव्हरटेकिंग लेनला गार्ड रेल बसवण्याचे काम सुरू होते. जेसीबीच्या सावलीत जेवण करत बसलेल्या सहा मजुरांना भरधाव कंटेनरने चिरडले. या हृदयद्रावक घटनेत तीन मजुरांचा जागीच मृत्यू
.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतांमध्ये गणेश सांडू कसारे (२७, रा. भिकापूर, ता. छत्रपती संभाजीनगर), राहुल राम गिरी (३१, रा. परतूर, जि. जालना) आणि विरेश्वर विश्वकर्मा (३२, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. तर ज्ञानेश्वर घोरपडे, राम गोपाल पटेल आणि शैलेंद्र रॉय या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला असून या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर जवळपास अर्धा तास महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
सुसाट कंटेनरच्या धडकेने मजुरांची जेवणाची वेळ ठरली अखेरची
सकाळपासून काम आटोपून मजूर मेंटेनन्स ट्रक आणि जेसीबीच्या मध्ये सावलीत जेवायला बसले होते. भरधाव कंटेनरने काही सेकंदात होत्याचे नव्हते केले. विखुरलेले डबे आणि रक्ताचा सडा पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच ४० सीडी ५३५५) सुरक्षा बॅरिकेड्स उडवत थेट ओव्हरटेकिंग लेनमध्ये घुसला. कंटेनरची धडक इतकी जोरात होती की लोखंडी जेसीबी (एमएच २० एसयू ३२०८) चे तुकडे झाले. दोन्ही वाहने फरफटत गेली.
समृद्धीवर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गेल्या काही महिन्यांत समृद्धी महामार्गावर मजुरांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप होत आहे. यापूर्वी दौलताबादजवळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केमिकलचे खिळे लावल्यामुळे अनेक वाहने पंक्चर झाली होती. या वेळी दौलताबाद पोलिस ठाण्यात मेघा इंजिनिअरिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मजूर मेघा इंजिनिअरिंग कंपनीसाठी काम करत होते. हाय-स्पीड कॉरिडॉरवर काम करताना मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले नाही. तर मजुरांबरेाबरच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहणांच्याही सुरक्षेच्या बाबतीत कुठलेच नियोजन नाही.
कामगारांचे अर्धवट जेवण, तिसऱ्या घासालाच काळाचा घाला शुक्रवारी सकाळपासून कामाला सुरूवात झाली होती. दुपारी १ वाजेदरम्यान जेवण करण्यासाठी सावलीचे ठिकाण दुर असल्याने कामाच्या ठिकाणीच जेसीबीच्या सावलीत जेवण करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. यावेळी जेवणाचे डबे उघडल्यानंतर अवघ्या तिसरा घास घेण्याच्या वेळेतच कंटेनरने जेसीबीला जोरदार धडक दिली. कंटेनरमध्ये जेसीबीसह मजुरही अडकल्याने २०० मीटर अंतरावर फरफटत गेले. तर घटनास्थळी जेवणाचे डबे, वाहनांचे पार्ट रस्त्यावर पसरले होते.
दहा दिवसांपूर्वीच कामावर
अपघाताची माहिती मिळताच मृताचे नातेवाईक दाखल झाले. अपघात विभागाच्या बाहेर येताच नातेवाइकांनी किंकाळी फोडली. एकमेकांच्या गळ्यात पडून आपल्या अश्रूला बांध मोकळा करून दिला. विरेश्वर विश्वकर्मा हे अवघ्या दहा दिवसांपूर्वीच कामावर आले होते. यातील गणेश कसारे यांना दोन मुले, मुलगी आहे. ज्ञानेश्वर घोरपडे हे दोन महिन्यांपूर्वीच कामावर लागले असून ते खाली उभे असल्याने त्यांच्या छातीत गंभीर मार लागला आहे, तर जखमी पटेल हे जेसीबी ड्रॉयव्हर आहेत. शैलेंद्र रॉय हे सर्व्हिस व्हॅनचे चालक आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



