
Chief Justice Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेल्या भूषण गवईंनी राज्यातील अधिका-यांवर नाराजी व्यक्त केलीये. सरन्यायाधीश झाल्यावर ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले, पण त्यांच्या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिवांसह अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली, त्यामुळे गवईंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अधिका-यांनी राजशिष्टाचार न पाळल्याने या प्रकरणाची सध्या बरीच चर्चा रंगलीये.
गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश गवई यांची नाराजी
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाली. शपथविधीनंतर सूत्र हाती घेतल्यानंतर भूषण गवई 18 मे रोजी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले. पण गवईंच्या दौ-याकडे राज्यातील अधिका-यांनी सपशेल दुर्लक्ष केलं. सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्याला राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची म्हणजेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची अनुपस्थिती होती. या गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
अधिका-यांचे कान टोचले
जेव्हा महाराष्ट्रातीलच एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येतो, तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव , DGP आणि पोलीस आयुक्त यांना योग्य वाटत नसेल, तर त्याबाबत त्यांनीच विचार केला पाहिजे,असे म्हटले. सोबतच या राजशिष्टाचार पाळला पाहिजे असं म्हणत अधिका-यांचे कान टोचले.
सरकारच्या वतीने मागितली माफी
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जाहिर नाराजी व्यक्त केल्यावर त्यांच्या चैत्यभूमीवरच्या अभिनयासाठी अधिका-यांनी लगबगीने हजेरी लावली. मात्र अधिका-यांच्या या वागणुकीमुळे आता त्यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय. महाराष्ट्राचे सुपुत्र नवे सरन्यायाधीश महाराष्ट्रात मुंबईत पहिल्यांदा आले. आणि आपल्या अधिकाऱ्यांनी तिथे न जाऊन त्यांचा अपमान केल्याचं नाना पटोले यांनी म्हंटल. तर सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबईत आले असताना ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल..सोबतच मी स्वतः फोन करून सरकारच्या वतीने माफी मागितल्याचही सांगितलं.
सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीसोबत घडणं स्विकारार्ह नाही
खरंतर कोणत्याही महत्वाच्या पदावरील व्यक्ती राज्यात येत असेल तर प्रोटोकॉल, राजशिष्टाचार पाळावाच लागतो..मात्र सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मुंबई दौ-यात अधिका-यांनी मारलेली दांडी खरंच अपमानास्पद आहे.एरवी नागरिकांच्या समस्येकडे अधिका-यांचं दुर्लक्ष असतंच मात्र एका सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीसोबत हे घडतं असेल तर हे नक्कीच स्विकारार्ह नाही. याबाबत विचार होणं गरजेचच आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.