
कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला पैशाअभावी उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार अमित गोरखे यांनी हा आरोप केला असून, त्यामुळं पुण्यात एकच खळबळ माजली आहे. (Pune News)
नेमकं काय घडलं?
सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना 29 मार्च रोजी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांना रक्तस्त्राव होत होता. हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी भिसे कुटुंबियांकडून 20 लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती दिली.
दहा लाख रुपये भरले तरच उपचार केला जाईल असं थेट रुग्णालयाकडूनच सांगण्यात आलं. ज्यावर कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये भरतो, असं सांगितलं. मात्र रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी ते मान्य न केल्यानं नाईलाजास्तव भिसे कुटुंबीयांना तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावं लागलं. यादरम्यान त्यांचा रक्तस्त्राव वाढला. वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन मुलींना जन्म दिला मात्र प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यातल्या रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असं गोरखे यांनी म्हटलं आहे.
तनिषा यांच्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा वेळीच जीव वाचवता आला असता असा गंभीर आरोप च्यांच्या कुटुंबीयांनी केला. तर, ‘पैशांअभावी गर्भवती महिलेनं जीव गमावणं ही आरोग्य व्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब आहे’ असा संतप्त सूर आळवत गोरखे यांनी आपण हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करणात असल्याचा शब्द दिला.
दरम्यान, पोलिसांकडून गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार असून रुग्णालयातील भिसे कुटुंबियांच्या संपर्कात राहिलेल्या नर्स आणि डॉक्टरांचा जबाब घेतला जाणार आहे. त्यांनतर अहवाल आरोग्य खात्याला दिला जाणारं आहे. याच कारवाईअंतर्गत गुरुवारी रात्री भिसे कुटुंबियांच्या जबाब नोंदवण्यात आला.
ज्या बाईंचा मृत्यू झाला त्यांचा शाप लागेल तुम्हाला…; राऊतांचा संताप
सदर घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर सामान्यांसह विरोधकांनीसुद्धा ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी मृत महिलेचे शाप सत्ताधाऱ्यांना लागतील अशा शब्दांत आगपाखड केली.
फडणवीसांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले, असं सांगताना ‘एका मातेचा करुण अंत झाला. काय करतायत फडणवीस? सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. सर्वसामान्यांची कामं देवेंद्र फडणवीसांच्या लेवलची नाहीत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. फडणवीसांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजेत. या पक्षाला किंवा या मुख्यमंत्र्यांना याची सवयच नाही. भाजपचे कार्यकर्ते तफडतायत, करुण अंत होतोय, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. अख्खा महाराष्ट्रात अराजकता माजलीये. तरीही तुम्ही कसला वेध घेताय? तुमच्या समोर एक माता जीव गमावते… 20 लाख रुपये नाहीयेत म्हणून… सामान्यांकडे कुठून येणार 20 लाख रुपये? माझ्याकडे सर्व माहिती आहे… तुमची लेवल खाली आणा. हा सर्वसामान्यांचा, तडफडून मरणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे इथे लक्ष द्या…’ असं म्हणत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
मृत भिसे आणि त्यांच्या कुटुंबीयांसारख्या अनेकांनीच तुम्हाला मतं दिली आहेत. काय करताय तुम्ही? असा खडा सवाल करत त्यांनी धाडस असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. ज्या डॉक्टरांची भिसे कुटुंब नावं घेतंय त्यांच्यावर कारवाई करण्याचं आवाहन फडणवीस सरकारला केलं. ‘ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल तेव्हा तुमच्याकडे कोणीही पाहणार नाही. ज्या बाईंचा मृत्यू झाला त्यांचा शाप लागेल तुम्हाला….’, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.