
Ajit Pawar Death Saamana Editorial: “अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नाही तोच अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीने दुसरा धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर संमिश्र लोकभावना आहेत. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या अशा भावना काही लोकांनी व्यक्त केल्या. हे पद काही कर्तृत्वाने मिळाले असे नाही. मात्र ही घडामोड नक्की कोणाच्या इच्छेने झाली? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
सुगावा कुटुंबाला लागू दिला नाही
“शरद पवार यांनी शांतपणे याचे उत्तर दिले आहे. ‘‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे व अजित पवारांनंतर पटेल, तटकरे वगैरे लोक पक्षाची धुरा सांभाळत आहेत.’’ सुप्रिया सुळे यांनीही त्याच पद्धतीने मत व्यक्त केले. म्हणजे सुनेत्रा पवार त्यांच्या दोन मुलांसह दुसऱ्याच दिवशी मुंबईला पोहोचल्या व आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला राजभवनात जात आहोत याचा सुगावा कुटुंबाला लागू दिला नाही. अजित पवारांच्या भाषेत सांगायचे तर ‘‘सध्या राजकारण लई वंगाळ झालं आहे’’ आणि या राजकारणाचे सूत्रधार ‘भाजप’चे सध्याचे नेतृत्व आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका मंडणाऱ्या ‘सामना’मधून म्हटलं आहे.
सुतक सुरू असताना असा शपथ सोहळा…
“सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचे की आणखी काही हा सर्वस्वी त्यांचा स्वतःचा व पक्षाचा निर्णय आहे. पक्ष अजित पवार यांचाच होता व अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली आमदारांचा गट सत्तेत सामील झाला. त्यामुळे पवारांच्या निधनानंतर पक्षाचे भवितव्य काय? नेता कोण? हे प्रश्न होतेच. म्हणून मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘‘अजितदादांनंतर पक्षाचे कार्यकर्ते व आमदार सैरभैर होऊ नयेत म्हणून सुनेत्रा पवार यांना घाईघाईने नेतेपदी निवडले.’’ मुश्रीफ यांचे म्हणणे खरे मानले तरी एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची युती ‘सनातनी’ विचारांच्या भाजपबरोबर आहे व घरात सुतक सुरू असताना असा शपथ सोहळा हिंदुत्वाच्या चौकटीत बसत नाही,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अजित पवारांचा पक्ष पुढे टिकेल व चालेल असे नाही
“सत्य वेगळेच आहे. दादांच्या निधनानंतर पक्षात अस्वस्थता निर्माण झाली. पोशिंदा व पालक निघून गेल्याने पोरकेपणाची जाणीव वाटली. त्यानंतर काही जणांच्या महत्त्वाकांक्षांना उधाण आले व उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्यात वाद आहे. पवार-पाटलांचा पक्ष हा पटेलांचा पक्ष होऊ नये म्हणून काही जणांनी धावाधाव करून सुनेत्रा पवार यांना उपसिंहासनावर बसवले. याचा अर्थ, अजित पवारांचा पक्ष पुढे टिकेल व चालेल असे नाही. भरसागरात नौकेचा नावाडी निघून गेला आहे व नौकेतील प्रत्येक जण नौका आपापल्या पद्धतीने वल्हवत आहे. सुनेत्रा पवार यांना नावेत चढवल्याने नाव वादळातून बाहेर पडेल काय? अर्थात, या नावेला फडणवीस यांचे इंजिन आहे व इंजिनाचा ‘रिमोट’सुद्धा फडणवीसांकडे आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



