
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीवरुन एकनाथ शिंदे विधानपरिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत प्रवेश केल्यानंतर शिंदे अधिकच आक्रमक झाले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही शिंदेंवर पलटवार केला. मात्र हा वाद इथेच संपला नाही. याचा दुसरा अंक सुरू झाला ट्विटरवर.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये मंगळवारी अधिवेशनात झालेले हे वार पलटवार. एकनाथ शिंदे विधान परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली आणि एकनाथ शिंदे प्रचंड आक्रमक झाले. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तर शिंदेंच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनीही शिंदेंवर जोरदार पलटवार केलाय. मात्र हा वाद इथंच संपलाय असं वाटत होतं. मात्र तसं नाहीय. या वादाचा दुसरा अंक आता ट्वीटरवर सुरू झालाय. दोन शिवसेनांमध्ये ट्विटरवॉर सुरू झालं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे हे राजकारणी असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदेंना लगावलाय.
हेही वाचा : नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक; जमावाला भडकवल्याचा आरोप
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर लिहिले की, मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला. त्याच्यावर बोलणारे हे कोण? तर रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत! अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये!
आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत शिंदेंवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. यात म्हटले की, ‘हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करुन औरंगजेबी विचारांचा हात धरणारे आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत. सत्तेसाठी काँग्रेसी गुळाला चिकटलेले हे मुंगळे बाळासाहेबांनी वेळीच चिरडून टाकले असते. ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठा आणि आदूबाळ हिंदुत्वाच्या विरोधात कट रचत आहेत, त्यांच्याच काळात औरंग्याच्या कबरीला कायदेशीर संरक्षण दिले होते. या दोघांच्यात थोडीही जनाची नाही तर मनाची शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचा निषेध करण्याची हिंमत दाखवावी. छत्रपती शिवाजी महाराज हे नातेसंबंध न पाहता केवळ शौर्य आणि नेतृत्वगुणाला महत्त्व देणारे होते. त्यांने नाव घेणारे आजचे महाराष्ट्र द्रोही मात्र नकळत्या वयातल्या लेकराला मंत्री करतात. मग पोरगं खांद्यावर बसलं की एक पाय वर करतं आणि भूंकतंही’.
औरंगजेबाच्या कबरीवरून सभागृहात सुरू झालेलं दोन्ही शिवसेनेचं वॉरचा पुढला अंक आता ट्विटरवरही पाहायला मिळतोय. त्यामुळे पुढल्या काळात दोन्ही शिवसेनांमध्ये अजुनही आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.