
Hanuman Jayanti Honeybee Attack On Devotees: देशभरामध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही अंजनेरी पर्वतावरही भाविकांची गर्दी झाल्याचं सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. मात्र अंजनेरी पर्वतावर हनुमानरायाच्या भाविकांची गर्दी झालेली असतानाच अचानक भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यामध्ये 70 ते 80 भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काही काळ भितीचं वातावरण
दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरु असतानाच अचानक मधमाशांनी भाविकांनावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे भाविकांची एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यामुळे या ठिकाणी काही काळ भितीचं वातावरण निर्माण झाला. मात्र नंतर मधमाशा तिथून दूर गेल्याने गोंधळ शांता झाला.
स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात केलं दाखल
पहाटेपासूनच अंजनेरी पर्वतावर भाविकांची वर्दळ सुरु होती. नेहमीप्रमाणे भाविक या ठिकाणी असलेल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते. त्यावेळी भाविकांच्या एका गटावर मधमाशांनी हल्ला चढवला. अचानक मधमाशांनी डंक मारण्यास सुरुवात केल्याने भाविक सैरवैर पळू लागले. अनेकजण आहेत त्या ठिकाणीच जमीनीवर झोपेलं. काही मिनिटांसाठी हा सारा प्रकार सुरु होता. काहींनी मधमाशांपासून वाचण्यासाठी अंगावर मिळेल ते कापड गुंडाळून मंदिरामध्ये प्रवेश केला. जमखी भाविकांना स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती येथील स्थानिकांनीच दिली.
नक्की वाचा >> Hanuman Jayanti: समर्थ रामदासस्थापित महाराष्ट्रातील 11 मारुती मंदिरं आहेत कुठे? जाणून घ्या सविस्तर
मधमाशांनी डंक मारल्यास काय होतं?
मधमाशांनी डंख मारण्यानंतरची गंभीर लक्षणं खालीलप्रमाणे:-
– श्वास घेण्यास त्रास होतो.
– जीभ किंवा घशात सूज येते.
– मूर्च्छा येते किंवा व्यक्ती बेशुद्ध पडते.
– त्वचेवर लालसरपणा किंवा खाज सुटण्याची समस्या जाणवते.
– अतिसार किंवा उलट्या होतात.
अंजनेरी किल्ल्याचं महत्त्व
अंजनेरी किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. हा किल्ला जनमानसात अगदी महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये परिचित आहे तो भगवान हनुमानांचे जन्मस्थान असल्याची मान्यता असल्यानेच! पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला ‘अंजनेरी’ नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे 108 जैन लेणी आहेत. अंजनेरी हा नाशिक – त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी फाटा आहे. इथून अंजनेरी गावात जाता येतं. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. दरवर्षी या ठिकाणी हनुमान जयंतीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते.
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्याच्या ठिकाणी गुहेत जैन धर्मीय लेणी आढळतात. पठारावर पोहोचल्यावर 10 मिनिटांतच अंजनी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. त्यामुळे हे ठिकाण ट्रेकर्सला मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर एक वाट डावीकडे सीता गुहेपाशी पोहोचते तर दुसरी वाट समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. बालेकिल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरून वेतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी-गोदावरी धरणाचा विस्तार पाहवयास मिळतो. या पठारावर एक तलावही आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.