
आमचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी उत्तम संवाद आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातल्या नेत्यांना बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या मुद्यावर
.
राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला कथितपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नाराज झालेल्या संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्ली स्थित काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुरूवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला असताना आता स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सपकाळ आमचे मित्र, त्यांच्याशी उत्तम संवाद
संजय राऊत याविषयी बोलताना म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते आमचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. आमचे उत्तम मित्र आहेत. त्यांच्याशी आमचा उत्तम संवादही आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातल्या नेत्यांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्यांच्यासोबत शिष्टमंडळात जायचा असेल, तर त्यांना ते त्यांच्या हायकमांडला कळवावे लागते. पण आमच्याकडे तसे नाही. आमचे हायकमांड महाराष्ट्रात आहेत. ते निर्णय घेते.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंबंधी काही चर्चा केली असेल, तर ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी ही भूमिका मांडली की, आम्हाला केंद्रात विचारावे लागेल. त्यानुसार त्यांनी केंद्रात चर्चा केली. मला वाटते, त्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ यांना दुसऱ्या बैठकीला दिल्लीत जायचे होते. त्यामुळे केंद्राने त्यांच्या हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना शिष्टमंडळात पाठवले. त्यानुसार थोरात व वर्षा गायकवाड शिष्टमंडळात सहभागी झाल्या. हा विषय एवढ्यावरच आहे. तुम्ही हे प्रकरण उगीचच रंगवत आहेत. त्यात काही अर्थ नाही.
महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री बसलेत
दादर येथे दरवर्षी मनसेकडून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. पत्रकारांनी याविषयी संजय राऊत यांना छेडले. ते म्हणाले, आत्ता आकाश बदलले आहे. यावेळी दोन भाऊ एकत्र आल्यामुळे दिवाळीचा आकाशकंदिल अधिक तेजस्वी होईल. गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे दिलेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण असा बदल महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री बसले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. मुख्यमंत्री अक्षरशः हतबल आहेत. अशा प्रकारचे पत्ते पिसण्याचे काम महाराष्ट्रात झाले, तर त्याचे महाराष्ट्र स्वागत करेल.
राज ठाकरे यांच्या 19 तारखेच्या मेळाव्याचे निमंत्रण ठाकरे गटाला मिळाले का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी आपल्याला त्याची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. योग्यवेळी योग्य घोषणा होत असतात, असे नमूद करत संजय राऊतांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच घोषणा होणार असल्याचेही स्पष्ट केले.
हे ही वाचा…
मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध?:संजय राऊत यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती; काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी
मुंबई – राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.