
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने हर्सूल भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मूळात आज सोमवारी ही कारवाई होणार होती. मात्र औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेचा निकाल आज येणार असल्याने ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
.
आता उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता हर्सूल टी पॉईंट येथून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. या कारवाईत हर्सूलच्या अंदाजे १५० मालमत्ता बाधित होणार आहेत. महापालिकेने या मोहिमेसाठी १५ जेसीबी, १५ टिप्पर, आणि ४ पोकलेन मशिन्स तैनात केल्या आहेत. याशिवाय अग्निशमन दल, कोंडवाडा विभाग, महापालिका अतिक्रमण हटाव विभागाचे २५० हून अधिक अधिकारी-कर्मचारी, विद्युत विभागाचे हायड्रॉलिक पथक आणि पोलीस प्रशासन कारवाईदरम्यान उपस्थित राहणार आहे.
शहरातील मुख्य रस्ते डीपी प्लॅननुसार अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. दीड वर्षांपूर्वी जी-२० परिषदेपूर्वी हर्सूलच्या मुख्य रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी १०० फूट रस्ता मोकळा करण्यात आला होता. आता उर्वरित १०० फूट रस्ता मोकळा केला जाणार आहे. हर्सूलचा हा रस्ता मूळात २०० फुटांचा आहे.
महापालिकेने एकूण सात रस्त्यांवरील अतिक्रमित मालमत्तांवर मार्किंगचे काम पूर्ण केले आहे. यात हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी पेट्रोल पंप (६० मीटर), नारेगाव रोड (३० मीटर), सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक (३० मीटर), सूतगिरणी ते शहानूरमियाँ दर्गा चौक (२४ मीटर), भाजीवालीबाई चौक ते आनंद गाडे चौक (२४ मीटर), महावीर चौक ते मिल कॉर्नर (३५ मीटर) आणि कॅन्सर हॉस्पिटल ते दिल्लीगेट (३५ मीटर) या रस्त्यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हर्सूल भागातील १५ मालमत्ताधारकांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यांना न्यायालयाने २८ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. आतापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवरील शेकडो मालमत्ता या मोहिमेंतर्गत जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



