
हिंगोली जिल्ह्यात पिक नुकसानीची पाहणी करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी, टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी बुधवारी ऑनलाईन बैठकीद्वारे नुकसानीचा आढ
.
हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. जिल्ह्यात पीक नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्री हिंगोलीत आले नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर ता. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांना भेट देऊन पाहणी केली.
या भेटीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अतिवृष्टीची पाहणी करून आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. याच बैठकीत जिल्हा नियोजनाचे मुद्दे उपस्थित करून ही बैठकही आटोपती घेतली अन जिल्ह्यातून काढता पाय घेतला.
पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी बुधवारी ता. १ अतिवृष्टीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना किती नुकसान झाले, शासनाकडून मिळालेल्या किती नुकसान भरपाईचे वाटप किती झाले याची माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या. तर पूरग्रस्त नागरिकांना तातडीने १० किलो गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शिवाय शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, स्मशानभूमीचे नुकसान झाल्यास तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मात्र हिंगोलीत येऊन अतिवृष्टीबाबत अधिकाऱ्यांची बैठक न घेता आता ऑनलाईन बैठक घेऊन काय उपयोग होणार असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे शेतकऱ्यांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.