
Gunaratna Sadavarte opposes Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही शाळेत हिंदी शिकवण्यावरुन मौन बाळगलेल्या मराठी कलावंतांना लक्ष्य केलं आहे. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आहे. 6 जुलैला गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय.
महाराष्ट्र सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मराठी अभ्यास केंद्राने 7 जुलै रोजी पुकारलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठींबा दिलाय. तर 6 जुलै रोजी राज ठाकरेंनी मोर्चाचे आवाहन केलंय. दरम्यान मनसेच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार विरोध केलाय. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कारण नसताना हिंदी सक्तीचा निर्णय महाराष्ट्रद्रोही सरकारने लादलाय. यासाठी सर्व पक्ष एकत्र येतायत. यांना महाराष्ट्रावर यांची हुकूमशाही लादायचीय म्हणून यांना शिवसेना संपवायची आहे. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन होईल. मी माझ्या राज्यात हिंदी सक्ती होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले तर हा विषय इथे संपेल. पण बटेंगे तो काटेंगे करुन विषाचा खडा टाकला जातोय. हिंदीला आमचा विरोध नाही. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे. हिंदी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्राने जोपासलं. अनेक कलाकार मुंबईत आले आणि मोठे झाले. आम्हाला हिंदीचं वावडं नाही पण एक विधान, एक प्रधान हे सर्व एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु आहे. आता भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
“मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकाशी बोलणार आहोत. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकाराला कळू दे. महाराष्ट्राने आपली संपूर्ण ताकद दाखवावी. सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघेल, विद्यार्थी, आणि पालकांना येता येईल यासाठी रविवार निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे. महारष्ट्रातील प्रत्येकाने यात सहभागी व्हावं. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे त्याविरोधात सर्व मराठी लोकांनी मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती आहे”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.