
Anjali Damania Post After Ajit Pawar Funeral: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवाला आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अखेरचा निरोप देण्यात आला. जय पवार आणि पार्थ पवार यांनी दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यानंतर 12 वाजून 15 मिनिटांनी शासकीय सलामी देण्यात आली. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं समर्थक उपस्थित होते. अजित पवारांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला असून यामध्ये अजित पवारांविरोधात अनेकदा उघडपणे आवाज उठवणाऱ्या अंजली दमानियांचाही समावेश आहे. अंजली दमानियांनी अजित पवारांचं निधन झाल्याच्या दिवशी आपल्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या होत्या. आज अजित पवारांना मुखाग्नी देण्यात आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच त्यांनी नवी पोस्ट केली आहे.
अंजली दमानियांचा अजित पवारांना विरोध का होता?
अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणली आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन टीकास्र सोडल्याचं पाहायला मिळालं आहे. 2012 मध्ये विजय पंधारे यांच्या पत्रामुळे अजित पवार यांनी सिंचनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अंजली दमानिया यांनी या घोटाळ्यात अजित पवारांवर गंभीर आरोप केले होतो आणि त्याविरुद्ध लढा दिलेला. तेव्हापासूनच अजित पवार आणि अंजली दमानियांमध्ये वैचारिक वाद होते.
नक्की वाचा >> अजित पवारांचा उत्तराधिकारी कोण? उत्तर सापडलं? ‘आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, सर्वसामान्य…’
अजित पवारांच्या निधनावर दमानियांची पहिली प्रतिक्रिया काय?
“डोकं खूप खूप सुन्न झालं ऐकून!” असं दामनिया यांनी अजित पवारांच्या निधनावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सोशल मीडियावरुन म्हटलं होतं. “विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे,” असं दमानियांनी म्हटलं होतं.
नक्की वाचा >> 66-6-6-6 चा विचित्र योग… अजित पवारांच्या मृत्यूचं 6 नंबरशी कनेक्शन पाहून बसेल धक्का
अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर दमानियांनी केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
दमानियांच्या या पोस्टची चर्चा असतानाच आता अजित पवारांच्या पार्थिवाला 12 वाजून 8 मिनिटांनी मुखाग्नी देण्यात आल्यानंतर 12 वाजून 32 मिनिटांनी दमानिया यांनी एक पोस्ट केली आहे. “अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. काल त्यांच्या निधनाने तो संघर्ष आज संपला आहे,” असं अंजली दमानियांनी आपल्या नव्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. “मतभेद तीव्र होते, पण मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण विचार करण्याचा आहे—लोकशाही, मूल्ये आणि संघर्ष यांचा! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार यासंदर्भातील संभ्रम अद्याप कायम आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



