
Maoist Letter To Maharashtra CM Devendra Fadnavis: माओवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटी म्हणजेच “एमसीसी झोन”च्या कमिटीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय या तिघांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात आत्मसर्पण करणाऱ्या भूपती आणि छत्तीसगडमध्ये समर्पण करणाऱ्या सतीश या दोन्ही वरिष्ठ कॉम्रेडच्या पावलावर पाऊल ठेवून आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
15 फेब्रुवारी 2026 पर्यंत…
एम. एम. सी. झोनमधील सर्व माओवादी एका सोबत सामूहिक आत्मसमर्पण करतील. मात्र त्यासाठी एकमेकांशी चर्चा करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत ही या पत्राच्या माध्यमातून एमएमसी झोन मधील माओवाद्यांनी मागितली आहे. या मुदतीपर्यंत सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स राबवले जाऊ नयेत. खबऱ्यांचे नेटवर्क काही दिवसांसाठी थांबवावे अशी विनंती ही माओवाद्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तर दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुदत मोठी वाटत असली तर…
लवकरच आणखी एक पत्र पाठवून सामूहिक आत्मसमर्पणाची तारीख जाहीर करू असेही या पत्रात माओवाद्यांनी म्हटले आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत जास्त वाटत असली, तरी ती केंद्र सरकारने माओवाद मुक्त भारतासाठी निश्चित केलेल्या 31 मार्च 2026 च्या मुदतीच्या आत आहे. त्यामुळे जर तिन्ही राज्यांच्या सरकारांनी एमएमसी झोन मधील माओवाद्यांना तेवढा वेळ दिला, तर एक मोठा सामूहिक आत्मसमर्पण करण्याची इच्छा माओवाद्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे 31 मार्च आधी महाराष्ट्रात यासंदर्भात मोठी घडामोड होईल असं मानलं जात आहे.

सर्वात मोठी शरणागती ऑक्टोबरमध्येच पडली पार
गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्येच 15 ऑक्टोबर रोजी झाली. या शरणागतीमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला. 6 कोटींचे बक्षीस असलेला मल्लोजुला राव उर्फ भूपती या दिवशी शरण आला आहे. भूपतीबरोबरच 50 हून अधिक नक्षलवाद्यांनीही शस्र खाली टाकत संविधान हाती घेतले. नक्षलवादाविरुद्ध गडचिरोलीमध्ये सुरु असलेल्या संघर्षामध्ये हा सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या विजयापैकी एक मानला जातो.
नक्की वाचा >> फडणवीसांनी ‘ती’ इच्छा पूर्ण करताच 6 कोटींचं बक्षीस असलेला व्यक्ती शरण; संविधान स्वीकारत…
आता नक्षलवाद्यांनी केलेल्या मागणीनुसार फडणवीस सरकारने वेळ दिला आणि खरोखर नक्षल्यांनी शरणागती स्वीकारली तर 15 ऑक्टोबरच्या विक्रमी शरणातीलाही मागे टाकणारी ही घडामोड असेल. विशेष म्हणजे तिन्ही राज्यांच्या सीमेवर सक्रीय असणारे हे नक्षली महाराष्ट्रामध्ये शरणाती पत्कारु इच्छित आहेत. हा फडणवीस सरकारबरोबरच केंद्र सरकारच्या माओवाद मुक्त भारतात मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा ठरेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



