
Sambhaji Bhide On Chhatrapati Shivaji Maharaj Hindutva: ‘शिवप्रतिष्ठान’चे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल मोठं विधान केलं आहे. बुधवारी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संभाजी भिडेंनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबरोबरच मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या शिवारायांच्या हिंदुतत्वावादी भूमिकेबद्दलही आपलं मत मांडलं आहे.
इतिहासाचा अभ्यास कमी पण…
संभाजी भिडेंनी, “शिवाजी महाराज सर्व धर्मीय नव्हते,” असं म्हटलं आहे. “शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे,” असा दावा संभाजी भिडेंनी केला आहे. “इतिहासाचा अभ्यास कमी पण शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत,” अशी टीकाही संभाजी भिडेंनी केली.
शहाजीराजेंचाही केला उल्लेख
“स्वतः शहाजीराजे यांनी हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे राष्ट्र करायचं आहे,असं बोललेले आहेत,” असं विधानही संभाजी भिडेंनी केलं. “शिवाजी महाराजांचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय त्यामुळे सगळा चोथा झाला आहे,” असा घणाघात संभाजी भिडेंनी केला.
नितेश राणेंनीही केलेलं विधान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम मावळे नव्हते असा वक्तव्य करुन नितेश राणेंनी नवा वाद ओढवून घेतल्याचं दोन आठवड्यांपूर्वी दिसून आलं. नितेश राणेंच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका केली. नितेश राणे पक्ष बदलतात तसा इतिहास बदलतात असा आरोपही विरोधकांनी केला. भाजपचे नेतेही नितेश राणेंचं समर्थन करताना दिसले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला होता. नितेश राणे इतिहासाचे चुकीचे दाखले देत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मुस्लीम मावळे नसल्याचं सांगून आपलं अज्ञान जाहीर केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. नितेश राणेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि शिवरायांचे थेट वंशज असलेले उदयनराजेही असहमत असल्याचं दिसून आले.
वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्यास भिडेंचा विरोध
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारक हटवण्याला संभाजी भिडेंनी विरोध केला आहे. “संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे,” असं संभाजी भिडे म्हणालेत. “वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे,” असा दवाही संभाजी भिडेंनी केला आहे. “वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे. याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. “स्वार्थासाठी कशीही मत बदलणाऱ्या माणसांना माझे मत पटणार नाही पण त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.