
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवं नवीन खुलासे होत आहे. आरोपी जयराम चाटे, सुदर्शन घुले आणि महेश केदार यांचा जबाब नोंदवला आहे. आता पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवण्यात आलाय. प्रत्यक्षदर्शीचा जबाब झी 24 तासच्या हाती लागला आहे. प्रत्यक्षदर्शीने जबाबमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रत्यक्षदर्शीने नोंदवलेल्या जबाबमध्ये सांगितलं की, 6 डिसेंबरला अवादा कंपनीबाहेर सुदर्शन घुले – संतोष देशमुखांमध्ये वाद झाला होता. सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबामुळे आरोपी सुदर्शन घुलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवादा कंपनीबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या या व्यक्तीने त्या दिवशी काय घडलं हे सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीने जबाबमध्ये सांगितलं की, 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला.
एवढंच नाही तर घुलेने अवादा कंपनीच्या गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली. त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले त्यांना सुदर्शन घुलेने ‘वाल्मीक कराडचा माणूस आहे’. कंपनी सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या’ अशी धमकी दिली. त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले. सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले. मात्र सुदर्शन घुलेने सरपंच तुला बघून घेईल तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, असं जबाबमध्ये प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
शिवराज देशमुख जबाबमध्ये काय म्हणाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी शिवराज देशमुख यांचाही जबाब नोंदवण्यात आला. फिर्यादी शिवराज देशमुख याच्या जबाबातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांचा हलगर्जीपणामुळे त्यांनी तक्रार नोंदवण्यास तीन ते साडेतीन तास लावले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांच्या जबाबातून धक्कादायक सत्य समोर आले आहेत. अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख हे लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि बनसोडे साहेब यांनी संपूर्ण हकीकतही पोलिसांना सांगितली. परंतु सदर पोलिसांनी मला तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवले पोलीस कर्मचारी म्हणू लागले की फिर्याद दमानी लिहावी लागते. तसंच कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावे लागते असे म्हणत होते त्यामुळे फिर्याद देण्याकरता बराच वेळ लागला.
जयराम चाटे म्हणाला की…
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराड नावाचा उल्लेख केला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. यामुळे वाल्मीक अण्णाची लोकांमध्ये आणि बीडमध्ये बदनामी झाली. त्यामुळे सुदर्शन भैय्याला वाल्मीक अण्णांनी या गोष्टीचा बदला घ्यायला सांगितले आहे. हा बदला घेण्यासाठी आज आपण सरपंच संतोष देशमुखला उचलून त्याला चांगली अद्दल घडवायची आहे. असा उल्लेख जयराम चाटेच्या जबाबात करण्यात आला.
कोण आहे सुग्रीव कराड?
सुग्रीव कराड हा केजमधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोबर त्याने काम केलं आहे. लोकसभेपर्यंत खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. मात्र आता सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणे यांचे नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे. तर सुग्रीव कराड राजकीय पटलावरील असून त्याने पंचायत समितीत आईला निवडून आणले होते. तर केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.