
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरु केलेलं आंदोलन तूर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना विचारलाय. काय आहे हे प्रकरण? समजून घेऊया.
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी, आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं. यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलनं सुरु केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे. आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता. त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की”.
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
ज्याप्रकारे राज ठाकरे व्यक्त होत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुरळा उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मान्यताप्राप्त पार्टी नाहीत. त्यांची नोंदणी रद्द करावी, संविधानाच्या विचाराला तडा जाऊ नये, अशी आमची मागणी होती. यामुळे राज ठाकरेंनी आपला निर्णय घेतल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मुंबई, ठाण्यात किती मराठी आहेत? गुजराती, मद्रासी किती आहेत? याच अभ्यास करा, असे आवाहन गुणरत्न सदावर्ते म्हणाले. राज ठाकरेंवर टीका करताना गुणरत्न सदावर्ते यांनी मंत्री उदय सामंत यांच्या भेटीचा संदर्भ दिला. उदय सामंतांच्या मतदारसंघात एक कंपनी येते, याचा संबंध आहे का? उदय सामंतांच्या हातात भरभरुन संपत्ती आहे. ते माझेही मित्र आहेत. त्यावर राज ठाकरे प्रसन्न झाले असतील. उदय सामंतांमुळे अंडरकरंट घडतात. राज ठाकरे असेच निर्णय मागे घेतात. कानाखाली मारण्याची अनुमती राज ठाकरे स्वत:च्या मुलाला देणार नाहीत. कारण क्रांतीकारी जन्माला यावा पण दुसऱ्यांच्या घरी. गुन्हे दाखल होतील, हे आता कार्यकर्त्यांना माहिती झाले आहे. म्हणून राज ठाकरेंना पत्र लिहून आंदोलन मागे घ्यावे लागले, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. राज ठाकरेंची पार्टी शून्य आहे. विधानसभा, लोकसभेच शून्य आहेत. येणाऱ्या पालिका, पंचायत निवडणुकीतही 1 ते 10 मध्ये असतील. महाराष्ट्र, मुंबईतील नागरिकांनी राज ठाकरेंना कच खायला लावली, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.