
मुंबई : माणिकराव कोकाटेंनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केलीय. चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना उपरती आली आहे. शेतकरी कर्जमाफीवरुन माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली होती. त्यामुळे दिलगिरी नको माफी मागा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे.
माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान यानंतर आता माणिकराव कोकाटेंना उपरती आली असून त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी आपल्या मुलांचा साखरपुडा आणि लग्न लावतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील टीकास्त्र डागलं होतं. तसंच सरकारमधील मंत्र्यांनी देखील कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. तसंच मंत्र्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठ्या त्रासातून सुटका! गावोगावी जिवंत सातबारा मोहिम
माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजप खासदार अशोक चव्हाणांनी बोलणं टाळलं, मात्र, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांनी केलेलं वक्तव्य योग्य असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याचा इशारा अजित पवारांनी दिला होता. माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सोलापुरात ठाकरेंची शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी कोकाटे यांच्या बॅनरला काळं फासलं होतं. तसंच त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तर दिलगिरी नको माणिकराव कोकाटेंनी माफी मागावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
माणिकराव कोकाटेंची शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधानाची ही काही पहिली वेळ नव्हती. या अगोदर देखील त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. पुन्हा एकदा कर्जमाफीवरुन त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, मात्र चहू बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर मंत्री महोदय माणिकराव कोकाटेंना उपरती आली आणि त्यांना दिलगिरी व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.