
Devendra Fadnavis On 72 Hours CM Post: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते बुधवारी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – अॅन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान एक रंजक किस्सा घडला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शैलीमध्ये भाष्यही केलं. कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांची ओळख करुन देताना त्याचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते असा करण्यात आला. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभ्या राहिलेल्या फडणवीस यांनी ही चूक लक्षात आणून देताना पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.
सर्वांना हे पुस्तक पाठवणार
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तयार केलेले तलाव व भक्तीस्थळे यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – अॅन इटरनल फ्लेम’ हे कॉफी टेबल बुक अतिशय सुंदर झाल्याचे सांगितले. तसेच या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रती देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील सर्व कॅबिनेट मंत्र्यांना आणि मुंबई व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना पाठवणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालोय
भाषणाची सुरुवात करताना फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते या उल्लेखावर आक्षेप घेतला. “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी माझा उल्लेख करताना मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो असं सांगण्यात आलं पण मी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेलो आहे. माझं 72 तासाचं मुख्यमंत्रिपद, पहाटेचं हे तुम्ही जरी विसरले असला तरी मी विसरू शकत नाही,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना, “अतिशय सुंदर असं कॉफी टेबल बुक बनवल्याबद्दल मी संपूर्ण टीमचा अभिनंदन करतो. आपल्याकडे त्यांचे फार काही फोटो नाहीत पण यामध्ये त्यांचे अतिशय सुंदर फोटो आहेत. मी फोटोग्राफरचे देखील अभिनंदन करतो आणि अमरीश मिश्रांसारखा सिद्ध लेखक असल्यानंतर ते उत्तमच होणार होतं आणि उत्तमच झालं आहे,” अशा शब्दांमध्ये पुस्तकांचं कौतुक केलं.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोककल्याणाचे कार्य करत असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पहिल्यांदा महिला सेनानींची तुकडी तयार केली, विविध कारागीर यांच्यासाठी तयार केलेल्या बाजारपेठेला राष्ट्रीय दर्जा देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, देशभरात पेशावरपासून रामेश्वरपर्यंत आणि कराचीपासून प्रयागराजपर्यंत व महाराष्ट्रामध्येही मंदिरांचे, घाटांचे पुनर्निर्माण करण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले, कावड यात्रेची परंपरादेखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरु केली.”
‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – अॅन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते आज ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – अॅन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन… pic.twitter.com/O5mAeZVOLO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2025
व्यावसायिक चित्रपट तयार करणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी चिरंतन आदर्श ठरावा यासाठी राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले असून आता त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल पुस्तकाचे लेखक-संपादक अंबरीश मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.