
Shaktipeeth Highway: राज्य सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाचं वेळापत्रक ठरलं आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधक आधीच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरणार आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर निश्चित झालीय. 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा वादाच्या भोव-यात सापडलाय.शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या इतरही मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होतोय. या मुद्यावरून अधिवेशनात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात अर्थ विभागानं काही शेरे मारले आहेत, असं बोललं जातंय. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय.
राज्य सरकारनं दोन दिवसांपूर्वीच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला मंजुरी दिली होती. मात्र, या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने कोल्हापूर, धाराशिव, बीड आणि अन्य भागात शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी जाणाऱ्या सराकारी अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांकडून हुसकावले जात आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरु शकतात. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तर शक्तीपीठाच्या आडून मोठा भ्रष्टाचार होणार असल्याचा दावा केलाय.
शेतक-यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारचा अट्टाहास का सुरूये, असा सवाल विरोधकांसह शेतकरी करताहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शक्तीपीठाच्या मुद्यावरून आगामी पावसाळी अधिवेशनात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांचे टीकेचे बाण सरकार कसे परतवणार हे पाहावं लागणार आहे.
‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’
भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टिका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वकव्य केलं. या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागीतलीय.भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतक-यांचा बाप काढला. जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळलीत. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली. बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खडसावलंय. शेतक-यांबाबत अशा प्रकारचं विधान करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर बबनराव लोणीकरांनी शेतक-यांबाबत केलेल्या विधानानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. सरकार शेतक-यांसाठी ज्या योजना राबवतं त्या जनतेनं दिलेल्या टॅक्समधून राबवल्या जातात. तसंच लोणीकरांनी केलेलं विधान गलिच्छ असल्याचं म्हणत सुळेंनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. लोणीकरांच्या विधानानंतर शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. राजू शेट्टी यांनी बबनराव लोणीकरांवर निशाणा साधत त्यांना आव्हान देखील दिलंय. तर दुसरीकडे रविकांत तुपकरांनी दिसेल तिथे लोणीकरांनी चोप देण्याचं आव्हान करत त्यांना दम देखील दिलाय. लोणीकरच नव्हे तर महाराष्ट्राचे कृषीमंत्र्यांनी देखील शेतक-यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावलाय.. शेतक-यांनी लवकरात लवकर कर्ज भरावं असं विधान त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान यानंतर त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.