
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, 9 जुलैपर्यंत अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तसंच, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोकणातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं नदीनाले ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. तर, तिथं नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं असतानाच विदर्भातील काही भागांमध्ये पावसानं तुरळक हजेरी लावली आहे. कोकणासह प्रामुख्यानं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह राज्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ओसरलेला जोर पुन्हा जैसे थे होणार असल्यानं या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, साताऱ्यासाठी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
शनिवार (5 जुलै)पासून वाढणार पावसाचा जोर
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरींची हजेरी असली तरीही शनिवार, 5 जुलैपासून मात्र राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या धर्तीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहनही करण्यात आलं आहे.
हवामानाच्या या स्थितीच्या आधारे पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात 9 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, लक्षद्वीपमध्ये अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. तिथं ईशान्य भारतातील अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
एकिकडे पाऊस थांबेना, दुसरीकडे बरसेना!
धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचं सावट आहे. मे महिन्यातला अवकाळी पाऊस आणि आता गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरचं खरीपाचं पीक धोक्यात आलं आहे. विशेषतः सोयाबीनचं पीक पाण्याअभावी माना टाकू लागलं आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं संकट उभं राहील.
तिथं अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहराला पाणीपुरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठाक पडला आहे. शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. यामुळे तलावावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. तलावातील बोटिंगही बंद करण्यात आलं आहे. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तर चिखलदरा शहरावर पाणीसंकट पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.