
मुंबईतील फिल्टर पाडा परिसरात मिठी नदीत एक तरुण वाहून गेल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने या तरुणाला काही अंतरावर सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
.
यासंबंधीच्या माहितीनुसार, पवईतील फुलेनगर परिसरातील फिल्टर पाडा भागात मिठी नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान असतो. येथून रस्त्याने जाणारा एक तरुण पाय घसरून नदी पात्रात पडला. सुदैवाने पाण्यात पडताच त्याच्या हाताला एक लोखंडी गज लागला. तो त्या गजाच्या आधाराने वेगवान वाहणाऱ्या पाण्यात पोहत राहिला. पण तो संकटात असल्याचे पाहून काही स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात दोर टाकला. दोरीच्या मदतीने त्याला वर खेचावे असा त्यांचा स्वच्छ हेतू होता. पण हा दोर पकडण्याच्या प्रयत्नांत त्याच्या हातची सळई (गज) सुटली आणि तो तसाच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
नागरिकांनी जीव धोक्यात घालून वाचवले
तो वाहून जात असल्याचे पाहून स्थानिक त्याच्या दिशेने धावले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांती जीव धोक्यात घालून बाहेर काढले. विशेष म्हणजे या भागात नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन केले होते. पण त्यानंतरही हा तरुण त्या भागात गेला होता. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, मिठी नदीने मुंबई शहरात अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई महापालिका प्रशासन या प्रकरणी अलर्ट मोडवर आहे. पण नागरीक धोक्याच्या ठिकाणी स्वतःहून जात असल्यामुळे अशा घटना घडत आहेत.
राज्याचे आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भींत कोसळून एका व्यक्तीचा बळी गेल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. एका व्यक्तीचा भींत कोसळून मृत्यू झाला आहे. मिठी नदीची पाणीपातळी धोक्यावर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत
दुसरीकडे, पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे काहीअंशी सुरू आहे. पण हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली आहे. दुपारनंतर भरती ओसरल्यानंतर स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज आहे. सरकारचेही स्थितीवर बारीक लक्ष आहे. पण कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. पर्यटन टाळावे असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई उपनगरांमध्ये मागील 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला. याशिवाय भायखळा, सांताक्रुझ, जुहू, वांद्रे परिसरातही अतिवृष्टी झाली. हवामान खात्याने पुढील 24 तासांतही पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा इशारा दिला आहे. ठाणे- कळवा -मुंब्रा खाडीला भरतीला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने खाडीकिनारी असणाऱ्या बोटीला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.