
Maharashtra Flood: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुरुवारी मराठवड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. मागील काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. त्यांनी पूरग्रस्त भागाची पहाणी करुन नेमकं किती नुकसान झालं आहे? रिकव्हरीला किती वेळ लागेल? यासारख्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी स्थानिकांबरोबर चर्चा करुन जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी
रात्री साडेआठच्या सुमारास उद्धव ठाकरेंचा हा दौरा उरकला. या दौऱ्यादरम्यान ठाकरेंनी पत्रकारांशी आणि पूरग्रस्तांशी बोलताना सरकारने तुटपुंजी मदत दिल्याचा दावा करत अधिक अधिक मदत आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची आठवण करुन दिली. मात्र अचानक एका व्यक्तीने उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करा असं म्हटलं असताना उद्धव ठाकरेंनी थेट हातच जोडल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
शेताच्या बांधावर जाऊन पहाणी
उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केली. वाटेत जिथे जिथे शेतकरी उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला हात दाखवत होते तिथे उद्धव ठाकरेंनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कर्जमाफीची आठवण करुन दिली. तसेच सध्या माझ्या हातात काही नाही मी इथे फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पिकांची पाहणी केली. त्यांनी शेत जमिनीचं नुकसान भरुन काढण्यासाठी किती वेळ लागेल यासारख्या गोष्टी शेतकऱ्यांकडून समजून घेतल्या.
उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेत हे ऐकताच…
याच चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे काही शेतकरी महिलांबरोबर बोलत असताना अचानक “उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेत,” अशी आरोळी गर्दीतून एकाने ठोकली. हे विधान उद्धव ठाकरेंच्या कानावर पडताच त्यांनी हात जोडत, “नको रे बाबा…” अशी प्रतिक्रिया नोंदवली. तसेच पुढे, “मला मुख्यमंत्री वगैरे नको…” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बँकेची नोटीस आली तर…
शेतकरी कर्जमुक्तीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी, “कोरोना काळात पीएम केअर फंडात महाराष्ट्रातील उद्योगपतींनी आणि भाजप आमदार-खासदारांनी अडीच लाख कोटी दिले. त्यातील फक्त 50 हजार कोटी दिले तरी शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतात. तरीही सरकार कर्जमुक्ती देत नाही,” असं विधान केलं. शेतकऱ्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी, “शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा एकत्र करून शिवसेना शाखेत आणून द्याव्यात. पुढे त्याचे काय करायचे, हे आम्ही पाहतो.” असे सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



