
पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूरमध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेती, घरांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. दरम्यान दोन दिवस पाऊस कमी झाला. मात्र, आज मध्यरात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा शेतांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय. तसंच नदीकाठच्या गावांमध्येही पाणी शिरलंय.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केलीय. मराठवाडा, सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे पुन्हा एकदा शेतांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरायला सुरूवात झालीय.
कळंब तालुक्यातील मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. आढाळा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, अख्खं गाव जलमय झालंय. जिल्हाशी गावाचा संपर्क तुटलाय. बहुला, खोंदला, आथर्डीसह 10 गावं पाण्याखाली गेले आहेत.
लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाने तडाखा दिला आहे. लातूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. सोनवती गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुफान पावसाने शेती पाण्याखाली गेलीय.
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ते पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस झालाय, वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. पावसामुळे नदी ओढे नाले तुडूंब भरून वाहतायत, वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे, दांडेगावसह परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला.
नांदेडच्या लोहा तालुक्यात पुन्हा ढगफुटीसारखा पाऊस झालाय. या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात आनंदा कोल्हे हा शेतककरी अडकून पडला होता. रात्री शेतावर गेला असता अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी एका झाडाचा आधार घेतला. ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सकाळीच बचाव कार्य सुरु केलं. आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं पुरात अडकलेल्या शेतक-याला दोराच्या सहाय्यानं सुखरुप बाहेर काढलं.
परभणीच्या गळाटी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड-पालम आणि गंगाखेड-राणीसावरगाव रस्ता बंद झालाय.. तसंच गंगाखेड, पूर्णा, पालम या तीनही तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे या नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.
सोलापुरातही पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सीना नदी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरंल आणि होत्याचं नव्हतं झालं. सोलापुरातील तेलगावामध्येही पुराचं पाणी शिरलं होतं. या गावातील एका कुटुंबातील चिमुकल्यांनी हिंमत न सोडता घरातील अनेक वस्तू वाहून जाण्यापासून रोखल्यात.
शेतक-यांना लवकरच मदत केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.. त्यासाठी काही नियम शिथिलही करू असंही यावेळी अजित पवार म्हणालेत कारण नियमांपेक्षा माणूस महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पंचनामे करण्याचं काम सुरू असून लवकरच शेतक-यांना मदत मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय.
पावसामुळे फक्त शेतीच नव्हे तर घरांचं देखील नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हतबल झालाय. कारण घरातही काही उरलेलं नाही आणि शेतामध्येही नाही. त्यामुळेच शेतकरी आता सरकारकडे आस लावून बसलाय. त्यामुळे दसरापर्यंत शेतक-यांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी आता जोर धरू लागलीय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.