
Diwalit Killa Ka Banvato: देशभराबरोबरच महाराष्ट्रातही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फटाके, फराळ, नवी कपडे यासंदर्भात नाविन्य सगळीकडे सारखं असलं तरी महाराष्ट्रातील दिवाळीची एक खासियत म्हणजे या काळात जागोजागी दगड माती वापरुन उभारले जाणारे किल्ले! ही गोष्ट तुम्हाला फक्त महाराष्ट्रात पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात नरकचतुर्दशी किंवा बालिप्रतिपदेच्या दिवशी किल्ला बनवून सजवण्याची परंपार का आहे हे माहितीये का? महाराष्ट्रातच दिवाळीमध्ये असे छोटे छोटे किल्ले का बनवले जातात? या मागे नेमके काय लॉजिक आहे? जाणून घेऊयात…
असा साकारला जातो किल्ला
विटा, ओबडधोबड दगड गोळा करणे. हे सारे दगड किल्ला वाटतील अशापद्धतीने रचने. त्यानंतर माती शोधून आणून चाळून घेणे. त्यात पाणी टाकून त्याचा चिखल बनवणे, दरम्यानच्या काळात ओलं पोतं टाकून त्या ओबडधोबड किल्ल्याला डोंगरांवरील चढ-उतार वाटेल असा आकार देण्याची प्रक्रिया केली जाते. अशाप्रकारे किल्ले बनवण्यामागे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कारणं आहेत. याच कारणांवर आपण या लेखातून प्रकाश टाकणार आहोत.
1) गडकिल्ल्यांचा इतिहास शिकवण्यासाठी:
महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा समृद्ध वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे रायगड, प्रतापगड, तोरणा यांसारखे किल्ले. विविध विश्वसनीय स्रोतांनुसार, महाराष्ट्रात एकूण सुमारे 350 ते 400 किल्ले आहेत. दिवाळीत किल्ला बनवल्यामुळे लहान मुलांना या इतिहासाची ओळख होते. ते किल्ले बांधताना गडांच्या रचनेची, त्यांच्या रक्षणात्मक वैशिष्ट्यांची माहिती शिकतात आणि इतिहास प्रत्यक्षात अनुभवता येतो.
2) शौर्य आणि ध्येयाचे प्रतीक:
किल्ला हे शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक मानले जाते. दिवाळी असा सण असतो ज्यात अंधारावर प्रकाशाचा, दुष्टावर सत्याचा विजय साजरा केला जातो. किल्ला बनवणे म्हणजे मनात सकारात्मक विचारांचे बीज रुजवणे, ज्यामुळे जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची प्रेरणा मिळते.
3) विरंगुळा
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला साकारणे ही एक मजेदार प्रक्रिया आहे. कुटुंबासोबत किल्ला उभारणे, त्यानंतर त्याची सजावट करणे यामुळे आनंद मिळतो. लहान मोठ्यांनी एकत्रितपणे यामध्ये सहभाग घेतल्यास परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. ही परंपरा फक्त मजा नसून आपल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक आहे.
किल्ल्याचे एकूण चार प्रकार
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे साधारणपणे चार प्रकार पडतात! गिरीदुर्ग (टेकाडीवरील), जलदुर्ग (पाण्यातील), वनदुर्ग (जंगलातील) आणि भुईकोट (जमीनीवरील)! रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, देवगिरी हे राज्यातील काही प्रसिद्ध किल्ले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.