
मुंबई आणि ठाणेलगतच्या परिसरातील वाहतूक कोंडी हा प्रश्न नेहमीचाच आहे. कधीकधी वाहतूक कोंडीमुळं प्रवासातच संपूर्ण दिवस जातो. 10 मिनिटांच्या प्रवासासाठी कधीकधी एक किंवा दोन तास लागतात. मुंबई व महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहे. ठाणे ते डोंबिवली प्रवास सोप्पा व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील मोठागाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार-लेन उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिली आहे.
मोठागाव येथेली रेल्वे फाटक हा अनेक वर्षांपासून मोठा अडथळा ठरत आहे. विशेषतः डोंबिवलीहून माणकोली उड्डाणपूलमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिवा-वसई रेल्वेमार्गावरील वाहतूक कोंडीमुळं दररोज स्थानिकांना प्रचंड विलंबाचा सामना करावा लागत आहे. MMRDA ने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 168 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात सुमारे 30 कोटी जमीन संपादनासाठी तर उर्वरित सुमारे 138 कोटी रुपये प्रवेशमार्ग बांधकाम आणि सुमारे 600 प्रभावित रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी वापरले जाणार आहेत.
सुरुवातीला या पूलाचा आराखडा दोन लेनचा होता. मात्र नागरिकांच्या मागणीनंतर दोन लेनऐवजी चार-लेनचा विस्तारित उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे. रेतीबंदर-माणकोली मार्गावरील वाहतूक कोंडीदेखील दूर होणार आहे.
उड्डाणपुलामुळं ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवरील प्रवास सोयीचा होणार आहे. या पुलामुळे डोंबिवली आणि ठाणे दरम्यान मानकोली उड्डाणपुलावरून प्रवासाचा वेळ जवळजवळ एक तासावरून फक्त 25मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
FAQ
हा प्रकल्प कशाबद्दल आहे?
मुंबई आणि महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, ठाणे ते डोंबिवली प्रवास सोपा व्हावा यासाठी डोंबिवली, मोठागाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार-लेन उड्डाणपूल बांधण्याचा हा प्रकल्प आहे.
कोणत्या रेल्वे फाटकावरील अडथळा दूर होणार आहे?
मोठागाव येथील रेल्वे फाटक, जो डोंबिवलीहून माणकोली उड्डाणपूलमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दिवा-वसई रेल्वेमार्गावर आहे, तो मोठा अडथळा ठरत होता.
प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहे?
रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवासातील मोठा विलंब दूर करून प्रवासाचा वेळ कमी करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



