
मनपा निवडणूकीत भाजपला सर्वाधिक २५ जागा मिळाल्या आहे, तरीही २०१७ च्या तुलनेत २० जागांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोअर कमिटीसोबत दोन ते अडीच तास मंथन केले. यावेळी पराभवाचे काही कारणं त्यांच्या समोर आलेले आहेत. दरम्यान पराभवाची आणखी कारणं जाणून घेण्यासाठी भाजपची राज्यस्तरीय समिती लवकरच शहरात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. येथील शासकिय विश्राम भवनावर आमदार प्रताप अडसड, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, माजी मंत्री प्रविण पोटे, माजी खासदार नवनित राणा, किरणताई महल्ले, जयंत डेहनकर, प्रा. रविन्द्र खांडेकर, प्रा. दिनेश सुर्यवंशी, किरण पातुरकर आदी सदस्यांसोबत पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठक घेतली. नाराजीमुळेच ४ ते ५ जागांचे नुकसान निश्चितच झाले एक जागेवर एकाच उमेदवाराला उमेदवारी देऊ शकतो. असे काही व्यक्ती होते कि, त्यांना उमेदवारी द्यायची मनातून ईच्छा असूनही देऊ शकलो नाही. मात्र पक्षाने तिकीट दिली नाही म्हणून इतर पक्षात जाणे किंवा पक्षविरोधी काम करणे योग्य नाही. अशा नाराजांमुळे आम्हाला निश्चितच ४ ते ५ जागांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच आमचे आठ ते नऊ उमेदवार हे दोनशे मतांच्या फरकाने पराभुत झाले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गट नेतेपदी महिलेला संधी! अशावेळी गटनेता म्हणून महिलेची सुध्दा वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या महिला नगरसेविकांची संख्या अधिक असल्यामुळे महापौर महिलाच करण्यात यावी, अशीही एक मागणी पालक मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तूर्तास गटनेत्याबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊ आणि त्यापुढील दोन ते तीन दिवसात कोअर कमिटीचे मत विचारात घेऊन पार्लमेंटरी बोर्ड नाव ठरवेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



