
Sanjay Raut On Ajit Pawar Death Politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या आघातातून महाराष्ट्र सावरला नसून, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अतिशय अमानुष आहे आणि त्यावर आपण बोलणार नाही, असं स्पष्ट मत शुक्रवार 30 जानेवारी 2026 रोजी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं.
अजित पवारांच्या पार्थिवाला कालच अग्नि दिला, त्यांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. तरी कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. तळागाळाचे कार्यकर्तेसुद्धा रडत होते अशा स्थितीत किमान पुढील 15 ते 20 दिवस राजकीय चर्चा करणं सर्वस्वी अमानुष आहे. अशा स्थितीत त्यांच्या पक्षांतर्गत विषयांवर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांच्या कुटुंबातील निर्णांवर आम्ही मत व्यक्त करणं योग्य नाही.
पवार कुटुंबातील प्रत्येक घटाच्या डोळ्यात अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार आता नको असं म्हणत माध्यमांनीही अशा विषयांना फाटे फोडू नये असं राऊतांनी स्पष्ट केलं. ‘या विषयावर आता बोलणं योग्य नसून, कोणी या विषयावर बोललं असेल तर ते माणुसकीशुन्य आहेत. मग ते मंत्री असो किंवा आमदार असो. त्या बाईने पती गमावला, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय, त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूधारा आहेत आणि त्यावर आता तुम्ही कोण नेतृत्त्वं करणार यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे. यावर मी बोलणार नाही’ असं म्हणत सगळं स्थिरस्थावर झाल्याशिवाय चर्चा नको असाच सूर आळवत राऊतांनी नेत्यांचेही कान टोचले.
बारामती विमान अपघात प्रकरणी संजय राऊतांकडून कोणत्या दोन अराजकीय मागण्या?
अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी, असं म्हणत मी दोन मागण्या केल्या त्या अराजकीय आहेत असं राऊतांनी स्पष्ट करत DCGA त्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. विमानवाहतुकीतील अनेक गोष्टींचं नियंत्रण असतं. मात्र गेल्या काही काळात अशा अनेक अपघात काहींचा मृत्यू ओढावला असं सांगताना, ‘बारामतीला एअरपोर्टला रडार नाही, एटीसी नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती. एक एअरस्ट्रीप होती आणि व्हीआयपी विमानं उतरत होती. बारामतीच्या विमानतळाला अपुरी कर्मचारी संख्या होती, जिथं शरद पवार, अदानींसारखी व्हीआयपी माणसं उतरत होती, याला जबादार कोण? अजित पवारांचं विमान आकाशात घिरट्या मारत होतं, त्याला लँड करण्याची संधी मिळत नव्हती. दृश्यमानता नव्हती म्हणतात, मग वैमानिकाला लँडिंगचा संदेश कोणी दिला? तिथं यंत्रणा नाही’, असं ते म्हणाले. ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर किंवा देशातील कोणत्या विमानतळावर नसतील कर डीजीसीए काय करतंय? असा प्रश्न त्यांनी आपल्याकडे उपलब्ध माहितीच्या आधारे उपस्थित केला.
‘अजितदादांवरील आरोप मागे घ्या…’
‘अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, सरकारनं नाही तर भाजपनं हे करणं कौतुकास्पद आहे. पण, याच भाजपनं दादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि यातलं काही ते सिद्ध करू शकले नाहीत. पंतप्रधानांनी हा आरोप केला. माझी विनंती आहे की दादांवर इतकं प्रेम असेल तर दादांवर केलेले आरोप मागे घ्या ही श्रद्धांजली असेल. ही विनंती आहे, राजकीय मागणी नाही. यात राजकारण नाही. अजितदादा आपल्यात नाहीत, नुसती श्रद्धांजली वाहून उपयोग नाही, त्यांच्यावरील आरोप मागे घ्या’ याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
महापौर निवडीवर राऊतांचा संताप…
अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही, तारखा पुढेपुढे जात आहेत असं म्हणत राऊतांनी वेळ दवडवडली जाण्यामागे मतमतांतरं कारणीभूत असल्याचं स्पष्ट केलं. ‘यांच्यामध्ये अजून मतभिन्नता असून, समित्यांच्या वाटपाची चर्चाच सुरुय, एकमत नाही. हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये? नगरसेवक निवडून आले आहेत त्यांना पालिकेत येऊ दे, कार्यकाळ सुरू होऊदेत . मात्र भाजप आणि शिंदे गटामध्ये मनपा सत्तेचं वाटप अडकून पडलं आहे’, असं म्हटलं. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याची चर्चा सुरू असून, शिवसेना किंवा इतर पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून अत्यंत घृणास्पद कृत्य सुरू आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधत. यात जे सामील झाले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत आणि ते अमित शाह यांचे चेले आहेत असा सणसणीत टोलाही लगावला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



