
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, अशी चर्चा सुरू झाली असून यात सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे समजते. तसेच उद्याच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाची शनिवारी दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील सुनेत्रा पवारच असाव्यात यावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा सुरू असल्याचेही समजते. उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच नरेश आरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे देखील समोर आले आहे. राजकीय गोष्टींची चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नरेश आरोरा यांना बारामती येथे बोलावले असल्याची माहिती आहे. त्यानुसार नरेश आरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आरोरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. काय म्हणाले होते छगन भुजबळ? पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर ठरवू- सुनील तटकरे सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेईल. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. पवार कुटुंब असेल किंवा पक्ष असेल आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. माझ्यासोबत दोनवेळा चर्चा करून राष्ट्रवादीचे नेते गेले आहेत. परंतु, त्यांचा जो निर्णय होईल त्यावर मी बोलणे योग्य नाही. पक्षाध्यक्ष पदावरही होणार निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची उद्या 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष पदावर कोण असणार यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे. सुनेत्रा पवारच पक्षाच्या अध्यक्षा असाव्यात, अशी लोकांची भावना आहे. त्यानुसारच पक्ष निर्णय घेईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे देखील पक्षाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असल्याचे समजते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



