
Ajit Pawar Death In Plane Crash Site White Papers: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवारांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलं आहे. अजित पवारांच्या जागी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या नाट्यमय शपथविधीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यासंदर्भातील जोरदार चर्चांनी राजकीय वातावरण ठवळून निघालं होतं. एकीकडे या राजकीय चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. खास गोष्ट अशी की अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्यांमध्ये अजित पवारांच्या पक्षातील काही नेते असून यामध्ये विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आघाडीवर आहेत. अमोल मिटकरींनी विमानत अपघातात सहा व्यक्ती मरण पावल्याचं आधी सांगण्यात आलं मात्र मृतदेह पाच जणांचे मिळाले मग ती सहावी व्यक्ती कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवायही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी हे प्रश्न गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता राऊतांनी अजित पवार स्वगृही म्हणजेच काका शरद पवारांसोबत मूळ प्रवाहामध्ये परत येणार होते असं दावा करतानाच अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर थेट अजित पवारांनी काही आठवड्यांपूर्वी उल्लेख केलेल्या 100 कोटींच्या भाजपासंदर्भातील घोटाळ्याचा संदर्भ दिला आहे.
अजित पवारांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि…
शरद पवारांनी अजित पवारांसोबत जे काही घडलं तो अपघात होता असं विधान केल्यावरुन राऊतांना दिल्लीत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना, “हे प्रकरण साधं नाही हे पवारांनाही कळेल. अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भाजपाचा पराभव. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता. अजित पवार मागे फिरले असते तर भाजपाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, तो मी उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. हे रहस्य आहे. हे पाहून जस्टीस लोयाची आठवण झाली. मी कोणावर आरोप करत नाही. पण या लोकांच्या मनातील शंका आहे. मिटकरींचे प्रश्न मी वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरुपाचे प्रश्न आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. अजित पवारांसारखा महत्त्वाचा व्यक्ती विमानात बसताना त्याच्या मूलभूत सुरक्षा तपासण्या नाहीत तर लोकांच्या मनात शंका येणारच, असंही राऊत म्हणालेत.
नक्की वाचा >> अजित पवारांसाठी ‘ते’ विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो
अजित पवारांनी केलेला भाजपाच्या ‘त्या’ घोटाळ्याचा उल्लेख
एवढ्यावरच न थांबता राऊतांनी, “माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आली. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं. माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, तो मी उघड करेन असं सांगितलं तेव्हाच माझ्या मनात धस्स झालं. याचा अर्थ असा होता अजितदादांनी भाजपासोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमधील उपमुख्यमंत्री उघडपणे सांगतो, यांच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे. त्यांनी 1995 च्या काळात सिंचनाचं बजेट वाढवून पक्षनिधीत कसे वळवले हे त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी बॉडी लँगवेज मी बघत होतो. ती स्पष्टपणे सांगत होती की अजितदादांना पुन्हा शरद पवारांसोबत जायचं आहे,” असंही म्हटलं.
…तर सहावी व्यक्ती कोण?
शरद पवारांनी अजित पवारांसोबत जे घडलं तो अपघात असल्याचं विधान केल्याच्या संदर्भातून बोलताना राऊतांनी, “पवार साहेब हे प्रगल्भ नेतृत्व आहे. कोणत्या वेळेला काय बोलावं आणि निर्णय घ्यावा त्यांना कळतं मुंबईच्या बॉम्बस्फोटा वेळी त्यांनी 13 ऐवजी 14 बॉम्बस्फोट झाल्याचं म्हणाले होते. त्यामुळे पवार तेव्हा जे बोलले तेव्हा ती गरज होती. आता अजित पवारांच्या पक्षाची लोकच संशय घ्यायला लागले आहेत. अमोल मिटकरींनी जे प्रश्न उपस्थित केले ते पाहता हा गंभीर विषय आहे. सहा प्रवासी सांगून पाच मृतदेह मिळतात तर सहावी व्यक्ती कोण? तिची बॉडीचं का मिळाली नाही?” असा सवालही केला आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान घडला भयंकर प्रकार! 25 लाखांचा फटका; 8 हजार पोलीस असतानाही…
दादांबरोबर भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का?
“विमानातील सर्व देह जळून खाक झाले. ओळख पटवता येत नव्हती अशावेळेला दादांच्या जवळच्या फाईल्सचे कागद जळालेले नाहीत. ते तसेच आहेत. दादांबरोबर भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून बारामतीला घेऊन चालले होते का सुरक्षित ठेवायला? मी राज्यसभेत हा विषय उपस्थित करेन,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांना कसला कंटाळा आला होता?
“काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले होते राजकारणाचा कंटाळा आला. तर त्यांना कसला कंटाळा आला होता? पडद्यामागे काही घडत होतं किंवा घडण्याची प्रक्रिया सुरु होती,” अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



