
Meeting for NCP Alliance: अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. अनेक नेत्यांनी विलिनीकरणासंदर्भात दावे केले असून स्वत: शरद पवारांनी 12 फेब्रुवारीला यासंदर्भात घोषणा होणार होती असं म्हटलं आहे. यादरम्यान आता एक नवी माहिती समोर येत आहे.
विलीनीकरणासाठी झालेल्या बैठकीतली आतली माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यास 2 मंत्रीपदं शरद पवार गटाला मिळणार अशी बैठकीत चर्चा झाली होती. एक केंद्रात तर एक मंत्रीपद राज्यमंत्रीमंडळात देण्याबाबत चर्चा झाली होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार, सुप्रिया सुळेंना केंद्रात आणि जयंत पाटील यांना राज्यमंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असं ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांनी काय म्हटलं आहे?
बारामतीमध्ये शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी पडद्यामागे काय सुरु होतं याबद्दलची माहिती अगदी सविस्तरपणे दिली होती. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा चार महिने सुरू होती. याचं नेतृत्व अजित दादा आणि जयंत पाटील यांच्यावर होती. अपघात झाला आणि यात खंड पडला,” असं शरद पवार म्हणाले होते.
या तारखेला होणार होती विलिनीकरणाची घोषणा?
“आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षात एकत्र काम करण्याचं एकमत होतं. हा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता. ही तारीख अजितदादांनीच दिली होती. दोन्ही पक्षात सकारात्मक चर्चा होती पण अचानक ही घटना झाली. दादांची इच्छा होती (दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची), ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे,” असं शरद पवार पडद्यामागील घडामोडींबद्दल माहिती देताना म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले दावे
“समजा अजित पवार साहेब जर विलीनीकरणसाठी चर्चा करत होते तर ते कोणतीही चर्चा भाजपाला न सांगता करतील का? चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाला सांगितलं असतं. ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. चर्चा करायची, नाही करायची, विलिनीकरण करायचं यासंदर्भात सर्वस्वी 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. फक्त त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी इतकी अपेक्षा असेल. आणि ते करतात आणि पुढेही करतीत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘मी अनेक गोष्टी सांगू शकतो’
पुढे त्यांनी म्हटलं होतं की, “जर अजित पवार अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर NDA मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का, ते काय सरकारमधून बाहेर पडणार होते का? सरकारमध्ये ते स्थिर होते. रोज काहीतरी गोंधळ निर्माण करायचा आणि मग आपली इको स्सिटम वापरुन ते कंफ्युजन इको करायचं ही पद्धत चूक आहे”. आम्हाला राजकारण करायचं नाही. अन्य़था मी अनेक गोष्टी सांगू शकतो असा इशाराही त्यांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



